पुस्तक वाचन प्रेरणेने पूर्ण केली नर्मदा परिक्रमा
परभणीतील सागरताई खिल्लारे यांचा 3200 किमीचा पायी प्रवास
परभणी : शहरातील वैभव नगरातील रहिवासी तथा महावितरणच्या सेवानिवृत्त सहायक लेखाधिकारी श्रीमती सागरताई ज्ञानेश खिल्लारे यांनी वयाच्या पासष्टीमध्ये नर्मदा परिक्रमा नुकतीच पूर्ण केली आहे. जवळपास 122 दिवसात 3 हजार 200 किमी अंतर पायी चालून त्यांनी ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली.
नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीला प्रदक्षिणा घालणे. नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीच्या काठाने चालून किंवा फिरून जाण्याची धार्मिक यात्रा, जी हिंदू धर्मात खूप महत्त्वाची मानली जाते. नर्मदा नदीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे आणि तिची पूजा केली जाते.
श्रीमती खिल्लारे ह्या महावितरणमधून डिसेंबर 2017 मध्ये सेवानिवृत्त झाल्या. त्या दरवर्षी नवरात्रोत्सवात परभणीहून पेडगाव येथे श्री रेणुकादेवीच्या दर्शनासाठी पायी जातात. विशेष म्हणजे त्यांना 10 वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास आहे. त्यासाठी नियमित योगासने त्या करतात. नर्मदा परिक्रमेबद्दल अनेकांकडून त्या ऐकून होत्या. दरम्यान, ‘नर्मदे हर हर’ हे जगन्नाथ कुंटे यांचे नर्मदा परिक्रमेवरील विलक्षण अनुभव कथन त्यांच्या वाचनात आले.
शतकानुशतकापासून असंख्य माणसं नर्मदा परिक्रमा करीत आली आहेत. जगन्नाथ केशव कुंटे हा असाच एक परिक्रमावासी. गेली अनेक वर्षं ते परिक्रमेमागून परिक्रमा करीत आहेत. एका झपाटलेल्या प्रवासाचं हे कथन, म्हणूनच नर्मदा परिक्रमेवरील लेखन विलक्षण रंगतदार आणि वेगळेपण घेऊन आलेले असल्याने श्रीमती खिल्लारे ह्या पुस्तक वाचनाने प्रभावित झाल्या. आपणही एकदा नर्मदा परिक्रमा करायचीच हा निश्चय त्यांनी मनामध्ये केला होता. दरम्यान, एकदा कारने त्या परिसरात फिरूनही आल्या. मात्र प्रत्यक्ष पायी चालून परिक्रमा करण्यासाठी 2024 साल उजाडले. त्यांच्या परिचयातील शिवकुमार अवचार (रा.डासाळा ता.सेलू जि.परभणी) याने मी नर्मदा परिक्रमेला जात आहे, तुम्हीपण चला असे सांगितले. तो पुढे गेल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील ऋषी पाठक यांच्यासोबत जायचे त्यांनी निश्चित केले. इंदौरमार्गे ते ओंकारेश्वरला पोहोचले.
22 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी त्यांनी नर्मदा परिक्रमेला सुरूवात केली. त्यांच्यासोबत जबलपूरचे दादागुरू होते. पहिल्या दिवशी 12 किमी पायी चालून मोरटक्का येथे आश्रमात मुक्काम केला. 122 दिवसांच्या या मोहिमेत शेवटी शेवटी एका दिवसात 35 ते 40 किमी अंतर त्यांनी पायी कापले. पंढरपूरला जाणार्या दिंडीसारखाच हा अनुभव होता. या परिक्रमेत 10 राज्यांमधून आलेले 1 हजार जण सहभागी झाले होते. दिनांक 18 मार्च 2025 रोजी ही नर्मदा परिक्रमा पुर्ण झाली.
श्रीमती सागरताई खिल्लारे यांनी ही परिक्रमा पुर्ण करण्यासाठी त्यांचे बंधू डॉ.दत्तात्रय मगर, मुले डॉ.चैतन्य खिल्लारे व उमेश खिल्लारे, स्नुषा डॉ.खुशबू चैतन्य खिल्लारे, सौै.प्रियंका उमेश खिल्लारे, नातवंडे लचित, रियांश खिल्लारे यांनी प्रोत्साहन दिले.