चंगळवादामुळे मानवी जाणिवा नष्ट होतायेत : दिलीप श्रुंगारपुतळे
सेलूत ‘एक दिवस एक पुस्तक’ उपक्रमांतर्गत कार्यक्रम
सेलू : चंगळवादामुळे संवादाचा परिघ संकुचित झाला असून त्यातून मानवी भावभावनांची गुंतागुंत निर्माण झाली आहे. चंगळवादामुळे असंख्य मानवी जाणिवा नष्ट होताना पाहावं लागणं हे दुर्दैव आहे, असे मत डॉ.दिलीप श्रृंगारपुतळे यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय सेलू येथे ‘एक दिवस एक पुस्तक’ या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. शृंगारपुतळे बोलत होते. अध्यक्षस्थानी सरस्वती राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून अरविंद सगर यांच्यासह माणिक पुरी, बापू काळे, महेश अचिंतलवार, रामराव बोबडे, सर्जेराव लहाने, डॉ. नयन राठोड, सुधाकर महाजन, अनिल रत्नपारखी, शुभदा गोळेगावकर, सुमिता सबनीस, चंद्रकला राऊत, नामदेव मोताळे मोहन पाटील, डॉ. राजाराम झोडगे, हनुमान व्हरगुंळे, सखाराम कदम, मदन जाधव, डि. के. माघाडे, पुनमचंद खोना, भुजंग आघाव आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना शृंगारपुतळे म्हणाले, आपलेपणा जिव्हाळा जपणारी खेड्यातील लोक अलीकडे पाहावयास मिळत नाहीत. तरुण चंगळवाद भरकटल्याने तो श्रमाला मुरड घालत असल्याचे आपण पाहतो आहोत. शेती पूरक व्यवसाय न करता तो शहरात कामधंदा करण्यासाठी जाताना दिसत आहे. तेथील चंगळवाद आणि राहणीमान पाहुन तो नको त्या व्यसननाधीन होत आहे. स्वतः हा चे अस्तित्व शोधण्यासाठी आंदोलना सारखं अस्त्र उगारल्याने ग्रामीण भागातील चित्र विचित्र होत आहे. माणसा माणसात तेढ आणि विसंवाद निर्माण झाला आहे. ताटाला ताट लावून भाकरी खाणारी माणसे दुरापास्त झाल्याचे चित्र दिसत आहे. चंगळवाद हा शहाराच्या सीमारेषा ओलांडून गावपातळीपर्यंत वेगाने पसरत गेला. ह्या चंगळवादमुळे असंख्य मानवी जाणिवा नष्ट होत गेल्या.. संवादाचा परिघ संकुचित झाला त्यातून मानवी भावभावनांची गुंतागुंत निर्माण झाली. हि गुंतागुंत उलगडत जाणारी कादंबरी म्हणजे गंगाधर गायकवाड यांची ‘धुळधाण’ होय, असे ते म्हणाले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सगर म्हणाले की एखाद्या उपक्रमाचं सातत्य टिकवून ठेवणे आणि कार्यक्रमाचं आयोजन करणं हे कठीण आहे. हिंदी मराठी ग्रंथालयाने गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाचं कौतुक केले पाहिजेत. धुळधाण कादंबरी म्हणजे गंगाधर गायकवाड यांच्या लेखणीला मिळालेली दाद आहे. खरंच वाचली जावी अशी हि कांदबरी आहे. तरुणपिढीने आवर्जून वाचली पाहिजे. अध्यक्षीय समारोप करताना राऊत म्हणाल्या वाचन संस्कार हा उत्तम संस्कार आणि संस्कृतीचं दर्शन घडविणारा प्रवास आहे. वाचनाने माणसात प्रगल्भता आणि सात्विकता अधिक वाढीस लागते. त्यामुळे प्रत्येकानं आपल्या व्यस्त वेळेतुन वेळ काढून वाचते झाले पाहिजे, असे म्हटले.
याप्रसंगी धुळधाण कादंबरीला खामगाव येथील महाविद्यालयाच्या वतीने वैखरी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यामुळे लेखक गंगाधर गायकवाड यांचा ग्रंथालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक सचिव चंद्रशेखर मुळावेकर, सूत्रसंचालन अनया विजय ढाकणे तर आभार रचना गायकवाड यांनी मानले.