भागवत कथेदरम्यान जपली विवाह सोहळ्याची परंपरा
सेलूतील विनोद बोराडे मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम
चांगले वागण्याचा प्रयत्न करा : कृष्णा महाराज जोगदंड
श्रीराम जन्नमोत्सवानंतर नगरभोजन महाप्रसादाचे आयोजन
सेलू जि.परभणी : सेलू येथील महेशनगरमधील श्री साईबाबा मंदिर संस्थानच्या वतीने गुढीपाडवा व श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्त आयोजित श्री साई महोत्सवात श्रीमद् भागवत कथेदरम्यान श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाहप्रसंगी शुक्रवारी, ४ एप्रिल रोजी डोईजडकर (सेलू) व साखरे (टाकळी कुंभकर्ण) परिवारातील आकांक्षा व अमोल यांचा विवाह वीरशैव लिंगायत धर्म पद्धतीने थाटात पार पडला. माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मित्रमंडळ व बोराडे परिवारातर्फे सामाजिक उपक्रमाची ही परंपरा यंदाही जपण्यात आली. या प्रसंगी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुकेशराव बोराडे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, व्यंकटबापू चव्हाण, लक्ष्मण बुरेवार, सुधाकर डोईजडकर, सुरेश साखरे, राजेंद्र झोडगावकर, प्रतिक बोराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कैलास स्वामी थळपती व कैलास स्वामी मिटकर यांनी पौरोहित्य केले. मागील २५ वर्षांपासून श्री साईबाबा मंदिरात श्री रामनवमी उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. सामाजिक बांधिलकी म्हणून होतकरू कुटुंबातील कन्येचा विवाह सोहळा हे या उत्सवाचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य मानले जाते. महोत्सवात भागवताचार्य प्रा.संजय महाराज पिंपळगावकर ३० मार्चपासून श्रीमद् भागवत कथेचे निरूपण करीत आहेत.
शुक्रवारी श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाहाप्रसंगी पिंपळगावकर महाराज यांनी विवाह, पती-पत्नीचे नाते याचे महत्त्व विशद केले. विवाह म्हणजे जीवाचे परमात्याशी अतुट नाते निर्माण होणे आहे, पती-पत्नी संसाररूपी रथाची दोन चाके आहेत. कुटुंबात सुसंवाद जपून नाते दृढ करण्याची मोठी जबाबदारी पती-पत्नीला पार पाडावी लागते, असे महाराज म्हणाले. याप्रसंगी माजी नगरसेविका उर्मिला बोराडे, विजया बोराडे, नयना बोराडे, रवी कुलकर्णी, रवी मुळावेकर, अशोक मसुरे आदींसह माता भगिनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चांगले वागण्याचा प्रयत्न करा : कृष्णा महाराज जोगदंड
श्री साई महोत्सवातील ‘सुंदर माझी गुढी स्पर्धा’ तसेच कीर्तनांना भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी रात्री भारूडरत्न कृष्णा महाराज जोगदंड यांनी संत एकनाथ महाराजांची विविध भारूडे सादर करताना प्रबोधन केले. ते म्हणाले की, दारू ही अनेक कुटुंबांची समस्या बनली आहे. याशिवाय मुलांसोबत आईवडीलही मोबाईलच्या व्यसनाच्या आहारी जात आहे. हे चिंताजनक आहे. त्यामुळे व्यसनमुक्त पिढी आणि समाज निर्मितीसाठी सर्वांनाचा पुढाकार आवश्यक आहे. मुलामुलींना चांगल्या संगतीत ठेवून त्यांच्यावर उत्तम संस्काराची गरज आहे. दुर्धर आजारातून बरे होण्यासाठी आज हॉस्पिटलमध्ये पाच सात दिवसांसाठी हजारों रूपये खर्च करावे लागतात. परंतु एक रूपयाही न घेता भगवंत आयुष्याची सुंदर भेट देतात. भगवंताची सर्वांवर निरंतर कृपा आहे. म्हणून सर्वांनी चांगले वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे जोगदंड महाराजांनी सांगितले.
श्रीराम जन्मोत्सवानंतर नगरभोजन महाप्रसाद
रविवारी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त शिवाजी महाराज खवणे यांचे कीर्तन, महाआरती व दुपारी एक ते चार वाजेपर्यंत नगरभोजन महाप्रसादाने उत्सवाची सांगता आहे. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.