रासायनिक व सेंद्रिय घटकांचा संतुलित वापर करावा : कुलगुरू डॉ.इन्द्र मणि

रासायनिक व सेंद्रिय घटकांचा संतुलित वापर करावा : कुलगुरू डॉ.इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात विशेष संवाद कार्यक्रम

रासायनिक व सेंद्रिय घटकांचा संतुलित वापर करावा : कुलगुरू डॉ.इन्द्र मणि

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयामार्फत “परंपरागत शेतीपासून आधुनिक शेतीकडेचा प्रवास” या विषयावर एक विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन ५ एप्रिल रोजी करण्यात आले. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिम्पोजियम हॉलमध्ये हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा.डॉ. इन्द्र मणि होते. प्रमुख पाहुणे व मुख्य मार्गदर्शक म्हणून गो-सेवा गतिविधीचे अखिल भारतीय मुख्य प्रशिक्षक के.ई.एन.राघवनजी हे उपस्थित होते. शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम आणि मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

कुलगुरू प्रा.डॉ. इन्द्र मणि यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय शेतीचा वैभवशाली इतिहास सांगून प्राचीन काळात ऋषीमुनींनी विज्ञानाचा आधार घेतला आणि शेती संशोधने विकसित केले, असे सांगितले. याबरोबरच त्यांनी अयोध्येत नुकत्याच पार पडलेल्या कुलगुरू परिषदेमध्ये ‘कृषि पराशर’ आधारित शेती पद्धतीवर झालेल्या विचारमंथनाचा उल्लेख केला. तसेच रासायनिक व सेंद्रिय घटकांचा संतुलित वापर, गो-आधारित शेती, सूक्ष्मजैविक घटकांचा उपयोग, कमी पाणी लागणाऱ्या पिकांची निवड तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर भर दिला. ते पुढे म्हणाले की, शास्त्रज्ञांनी काळानुसार समाजहिताची संशोधने केली. भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण असून आपत्कालीन परिस्थितीत जगालाही मदत करू शकतो. परंतु पंजाबसारख्या राज्यात रसायनांचा अतिरेक आणि पाण्याचा अतिवापर यामुळे निर्माण झालेल्या समस्यांपासून शिकण्याची गरज आहे.

के.ई.एन.राघवनजी यांनी आपल्या मार्गदर्शनातून वेदाधिष्ठित शेती ज्ञान, जमिनीचे प्रकार, जलप्रकार, औषधी गुणधर्म असलेले अन्न, आणि सूक्ष्मजैविक घटकांचे महत्त्व, तसेच पारंपरिक शेती पद्धती आणि सेंद्रिय शेतीतील शास्त्रीय दृष्टिकोन यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “शेती हा व्यवसाय नसून एक शास्त्र आहे”, हे वेदांमधून स्पष्ट होते. त्यांनी प्राचीन शेतीत वापरल्या जाणाऱ्या २४ बैलांद्वारे चालविल्या जाणाऱ्या १२ नांगरांच्या पद्धती, तसेच नैसर्गिक किड नियंत्रणाच्या उपाययोजना याबाबत माहिती दिली. त्यांनी आधुनिक काळात हरितक्रांतीसाठी अवलंबलेल्या रासायनिक घटकांमुळे झालेले परिणामाची आणि चुकीच्या अवलंबन पद्धतीची माहिती दिली. आधुनिक शेतीमध्ये निसर्गातील जीवसृष्टीवरील रासायनिक घटकांमुळे होणारे दुष्परिणाम टाळणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी गाईच्या शेणाचे आणि मूत्राचे महत्त्व पटवून दिले तसेच जमिनीत असलेल्या सूक्ष्म जैविक घटकांचेही महत्त्व सांगितले.

या कार्यक्रमात पारंपरिक शेतीच्या पद्धती, सेंद्रिय शेती, तंत्रज्ञानाचा वापर, तसेच शाश्वत शेतीसाठी नव्या उपाययोजना यावर सखोल चर्चा झाली. प्राध्यापकांना व विद्यार्थ्यांना आधुनिक कृषिविज्ञानाची जाण करून देण्याचा मुख्य उद्देश या सत्रामागे होता. कार्यक्रमासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. पी. कदम आणि डॉ. पी. आर. देशमुख यांनी संयोजनाची भूमिका पार पाडली.

कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. राहुल रामटेके, डॉ. राजेश क्षिरसागर, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. गजेंद्र लोंढे यांचाही सहभाग होता. यावेळी कृषि शिक्षण व संशोधन क्षेत्रातील मान्यवरांची तसेच विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी आणि विद्यार्थी यांचा सहभागही लक्षणीय ठरला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!