
नाफेड केंद्रावर वाहनांच्या रांगा, हरभरा खरेदीची मागणी
परभणी : सेलू (जि.परभणी) येथील नाफेड खरेदी केंद्रावर बारदाना नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी ठप्प झाली आहे. चार दिवसांपासून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. शुक्रवारी हरभरा खरेदीचे पोर्टल बंद केले गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (तीन जून) बोंबाबोंब आंदोलन केले.
18 जूनपर्यंत सात लाख 76 हजार मेट्रिक टन हरभरा खरीदीचे शासनाचे उद्दिष्ट आहे. शासन निर्णयाला हरताळ हरभरा खरेदी बंद करण्यात आली आहे. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी सेलू शेतकर्यांच्या वतीने बंद असलेल्या केंद्रासमोर खुर्चीवर हरभऱ्याचे पोते ठेवून त्याला हार घालून प्रदक्षिणा घालत, बोंब मारत शासनाचा निषेध करण्यात आला. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. येत्या दोन दिवसात हरभरा खरेदी सुरू नाही केली, तर नाफेड केंद्रासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग शेळके, माणिक शेळके, भगवान डख, बाबासाहेब आंधळे, शंकर शेळके, बाबासाहेब आंधळे, निशिकांत रोडगे, सतिश इघारे, पवन रोडगे, कृष्णा रोडगे, दिलीप ताठे, बालासाहेब बालटकर, रवि मोगल, रामा बोडखे, नामदेव पौळ, गोपाळ करवा आदींसह शेतकरी उपस्थित होते.
