मराठवाड्याच्या कवीला प्रथमच बहुमान
Authored By Babasaheb Helaskar
परभणी : सेलू (जि.परभणी) येथील नूतन महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक, जेष्ठ लेखक, समीक्षक व कवी विश्वास वसेकर यांना, महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे भा.रा.तांबे स्मृती पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले.
पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांच्या हस्ते वसेकरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी उपस्थित होते. साहित्य परिषदेतर्फे काव्य क्षेत्रातील मोलाच्या योगदानाबद्दल सृजनशील ज्येष्ठ कवीला भा.रा.तांबे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
यापूर्वी मंगेश पाडगांवकर, वसंत बापट, कवी यशवंत यांसारख्या दिग्गज कवींचा या पुरस्काराने सन्मान झाला आहे. वसेकरांच्या रूपाने प्रथमच मराठवाड्याच्या कवीला हा बहुमान मिळाला आहे. वसेकरांच्या काव्य लेखनाला यंदा पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांचे दहा कविता संग्रह प्रसिद्ध झाले असून, संस्कृती प्रकाशनातर्फे नुकताच त्यांचा ‘मूल्यत्रयीची कविता’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. पुरस्काराबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ एस.एम.लोया, सचिव डॉ.विनायकराव कोठेकर, प्राचार्य द.रा.कुलकर्णी, डी.के.देशपांडे, जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, डॉ.शरद कुलकर्णी, कथाकार डॉ.आसाराम लोमटे, बाबासाहेब हेलसकर, रामकिशन मखमले, डॉ.सुहास सदाव्रते आदींसह मराठवाड्यातील शिक्षण व साहित्य वर्तुळातून प्रा.वसेकर यांचे अभिनंदन होत आहे.