शेतकऱ्यांचे जोरदार रास्ता रोको आंदोलन
चिकलठाणा पाटीवर आंदोलन, तीन तास वाहतूक ठप्प
महामार्गासाठी संपादित जमिनीच्या मोबदल्याची मागणी
सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : दरनिश्चीती समितीच्या मंजुर प्रपत्र १ प्रमाणे तत्काळ मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी जालना-परभणी-नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांनी सेलू (जि.परभणी) तालुक्यातील चिकलठाणा पाटीवर सोमवारी, २१ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजल्यापासून बैलगाड्यासह जोरदार रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे सुमारे सेलू – देवगाव फाटा रस्त्यावर तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
रामेश्वर गाडेकर, रमेश माने, प्रशांत नाईक, रघुनाथ टाके, विजय खरात, पप्पु गाडेकर, सुंदर गाडेकर, निशांत मुंडे, सुनील लिपणे, सोनु खरात यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग बाधित नऊ गावातील शेतकरी, महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
जालना-नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होत असून शेतकऱ्यांना पुरेसा मावेजा मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. या प्रकरणी शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत प्रशासनाने भूसंपादन बाबतीत कुठलाही निर्णय घेऊ नये, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या वेळी तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांना निवेदन देण्यात आले. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी दरनिश्चीती समितीची जिल्हास्तरीय बैठक झाली होती. त्यामध्ये प्रपत्र १ ला समीतीने मंजुरी दिलेली आहे. तसेच उच्च न्यायालयात दाखल याचिका क्र. ३२२९/२०२५ मधील २४ मार्च २०२५ चे आदेश दिलेले असतानादेखील अद्यापपर्यंत मावेजा वाटप केलेला नाही. विलंबामुळे आम्हा सर्व बाधीत शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे मंजुर प्रपत्र १ प्रमाणे तत्काळ मोबदला देण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान, तहसीलदार डॉ.मगर यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.