सेलूतील शेतकरी पिकविम्यापासून वंचित

सेलूतील शेतकरी पिकविम्यापासून वंचित

नगरपालिकाच्या हद्दीचे कारण सांगत विमा कंपनीने पिकविमा नाकारला, लोम्बार्ड कंपनीचा अजब कारभार

सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : सेलू शहराच्या शिवारातील जमीन नगरपरिषदेच्या हद्दीत येते त्यामुळे पिकविमा मंजुर करता येत नाही, असे जुजबी कारण देत पिकविमा कंपनीने सेलू शहर शिवारातील शेतकऱ्यांना पिकविमा नाकारला असून त्यामुळे शहर शिवारातील शेतकरी पिकविम्या पासून वंचित राहिले आहेत.

२०२४-२५ च्या खरीप हंगामात पावसाअभावी सेलू तालुक्यातील बहरात आलेली उभी पिके वाळून गेली. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकविमा केंद्रावर आपल्या पिकांचा पिकविमा काढला तसेच ई-पिकपाहणी, पिकांचा स्पॉट पंचनामा, असे सर्व सोपस्कार पूर्ण केले‌. मात्र, विमा कंपनीने न.प.शहर शिवार हद्द व शासनाचे निर्देश कारण देत व पिकविमा नाकारण्यात आल्याची माहिती विमा कंपनीचे प्रतिनिधी श्री‌झाडे यांनी दिली.

तालुका कृषी अधिकारी श्री. काळे यांना विचारणा केली असता पिकविम्याबाबत अशा प्रकारचे शासनाचे कोणतेही निर्देश अथवा परिपत्रक नसल्याच स्पष्ट करून हा विषय पुढील कार्यवाहीसाठी कृषी आयुक्तांकडे पाठविण्याचे आश्वासन निवेदन कर्त्यांना दिले आहे. शेतकऱ्यांच्या पिकविम्या बाबत लोम्बार्ड कंपनीचा मनमानी कारभार हा शेतकऱ्याच्या फसवणुकीचा प्रकार असून याची तत्काळ चौकशी करून सर्व शेतकऱ्यांना पिकविमा मिळवून द्यावा, अशी मागणी तालुका कृषी अधिकारी यांना करण्यात आली आहे. निवेदनावर भाजपाचे डॉ.गणेश थोरे, कपील फुलारी, विशाल लोया, शिवकुमार नावाडे, सुरेश खेत्रे, व्यंकटेश काबरा, रामप्रसाद सुरोसे, महेश नावाडे, डॉ.अश्वीन भरड, शिवाजी गोरे, जकी पठाण, सुभाष फोपसे, सतीश भोसले, गोपाल लोया, रंगनाथ काळे आदी शंभरावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!