मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे धरणे आंदोलन
जनविरोधी जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी
सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : जनविरोधी जनसुरक्षा विधेयक रद्द करावे यासह विविध इतर मागण्यांसाठी भारताचा कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने (मार्क्सवादी) २२ एप्रिल रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.
या वेळी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आपल्या न्याय्य मागण्यासाठी संघटित होवून आंदोलन करणे हा नागरिकांना संविधानाने दिलेला मुलभूत अधिकार आहे. हा हक्कच हिरावून घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार जनसुरक्षा विधेयक आणून लोकशाहीला तिलांजली देवून मागच्या दाराने हुकुमशाही आणू पाहत आहे. त्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जाहीर धिक्कार करत आहेत.
त्याच प्रमाणे सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व सेलू शहरातील जमिन व गाळे धारकांच्या प्रश्न मार्गी लावावा, सेलू ते डिग्रस (जहांगीर) व डिग्रस ते गोगलगाव पाटी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करावे, वेळेत काम पूर्णन करणाऱ्या गुत्तेदारावर कठोर कारवाई करावी. स्मार्ट मिटरची जबरदस्तीने व विनापरवानगी अंमलबजावणी करून नये, सेलू तालुक्यातील विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी ३८००० रूपये विमा अदा करावा, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर कॉम्रेड उद्धव पौळ, रामेश्वर पौळ, रामकृष्ण शेरे, सुभाष शहाणे, रामप्रसाद पौळ, धोंडीराम पातळे, सुहास पंडित, राहुल डंबाळे आदींच्या सह्या आहेत.