विकासकामे दर्जेदार करण्यास प्राधान्य द्या : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यसरकार पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकासकामे वेगाने व गुणवत्तापूर्ण करण्यास प्राधान्य देत आहेत. या विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करताना ती मुदतीत व दर्जेदारपणे पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व कार्यान्वयीन यंत्रणा प्रमुखांना शनिवारी, २६ एप्रिलरोजी आयोजित आढावा बैठकीत दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार संजय जाधव, विधान परिषद सदस्य विक्रम काळे, आमदार डॉ. राहुल पाटील, रत्नाकर गुट्टे, राजेश विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी उपस्थित होते.
सरकारच्या तिजोरीतून विकासकामांना दिला जाणारा निधी यापुढेही कमी पडणार नाही. मात्र, जिल्हा प्रशासनाने योजनांची योग्य आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा गैरवापर झाल्यास अजिबात खपवून घेतले जाणार नाही. सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कामे वेळेत पूर्ण करावीत. असे सांगून परभणी शहर आणि कार्यालयातील स्वच्छतेवर भर द्यावा. या कामांची तपासणी त्रयस्थ यंत्रणेकडून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना असून ही योजना बंद होणार नसल्याचे श्री.पवार यांनी निक्षून सांगताना लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत. मात्र, गरजू आणि पात्र लाडक्या बहिणींनाच हा निधी मिळेल, याची दक्षता घ्यावी.पाऊस पडेपर्यंत एप्रिल, मे या महिन्यात पाणीपट्टी थकबाकी वसुली करताना नागरिकांना जास्त ताण न देता पिण्याचे पाणी देण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश श्री.पवार यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच जिल्ह्यात चारा व पाणीटंचाई प्रश्न उद्भवणार नाही, याची काळजी घेताना उन्हाळ्यात कोणतीही चारापाण्याची अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी. मागणी आल्यास तात्काळ पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
ॲग्रीस्टॅक या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी, नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अनुदान, शेतकरी आत्महत्या आढावा त्यांनी घेतला. तसेच गाव नमुना ८ प्रमाणे अतिक्रमण, बंद झालेले पाणंद रस्ते, शेतरस्ते, शिवार रस्ते मोकळे करण्याच्या सूचना केल्या. सौरऊर्जा हा सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही श्री. पवार यांनी संबंधित यंत्रणेला दिले. तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या घरकुल आवास योजनांना लागणारी १० टक्के रेती महसूल विभागाने मोफत उपलब्ध करून द्यावी. तसेच इतर बांधकामांना लागणाऱ्या रेतीला टप्प्याटप्प्याने क्रशसँडचा पर्यायी वापर वाढविण्याच्या सूचना केल्या.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या स्वस्त धान्याचे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे वितरण डीबीटीद्वारे करण्यासाठी आवश्यक सर्व्हे ३० जूनपर्यंत १०० टक्के पूर्ण करावे. तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचीही अंमलबजावणी करण्यास सांगितले. धान्याचे वितरण उशिराने होणे, ही गंभीर बाब असल्याचे सांगून त्यात तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना केल्या.
विमानतळासाठी जागा शोधा
परभणी जिल्हा औद्योगिकदृष्ट्या मागास असून येथे उद्योग उभारणीसाठी उद्योजकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. त्यासाठी परभणी येथे विमानतळ धावपट्टीसाठी जागा शोधण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. बसस्थानक परिसर स्वच्छ करून तिथे पावसाळ्यात वृक्षारोपण करण्याच्या विभागीय नियंत्रकास सूचना दिल्या. पाथरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा विकास करताना पुण्यातील चाफेकर स्मारक, साईबाबा संस्थानाच्या धर्तीवर कामे करण्याचे निर्देश दिले. ताडकळस-सिंगणापूर येथील उड्डाणपूल बांधकाम, न्यायालयीन इमारत बांधकाम, ताडकळस धानोरा येथील नदीवरील पुलाचे बांधकाम, येलदरी येथील पुर्णा नदीवरील पुलाचे बांधकाम, परभणी पोलीस वसाहत बांधकाम, मागेल त्याला सौर कृषिपंपाचा आढावा श्री. पवार यांनी घेतला. जिल्हाधिकारी श्री. गावडे व पोलीस अधीक्षक यांनी श्री.परदेशी यांनी सादरीकरणाव्दारे यावेळी सविस्तर माहिती दिली. बैठकीच्या प्रारंभी पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. बैठकीस सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.