जीवनाच्या समृद्धीसाठी भागवत ऐकावे : सद्गुरु चैतन्य महाराज देगलूरकर
सेलूत श्रीमद् भागवत कथेला सुरूवात, ॲड.किशोर जवळेकर परिवाराच्या वतीने आयोजन
सेलू : आम्हाला आमच्या जीवनाची ध्येय निश्चिती कळली पाहिजेत. कारण निश्चयात्मक भूमिकेचा अभाव जीवनात निर्माण झाला तर जीवन अस्थिर होते. अस्थिर जीवन कधीही समाधान देऊ शकत नाही. स्थिर विचार समाधानाचे माध्यम आहे. म्हणून ध्येयनिश्चितीसाठी भागवत ऐकावे, असे प्रतिपादन सद्गुरु चैतन्य महाराज देगलूरकर (पंढरपूर) यांनी केले. सेलू येथील श्री साईबाबा मंदिर सभामंडपात ॲड.किशोर जवळेकर, मंजुषा जवळेकर परिवारातर्फे आयोजित केलेल्या श्रीमद् भागवत कथेला सोमवारी, २८ एप्रिल रोजी सुरूवात झाली. या वेळी कथा विवेचन करताना देगलूरकर महाराज बोलत होते.
देगलूरकर महाराज म्हणाले, की ध्येय निश्चित झाल्यानंतर नियत साधनांच्या प्राप्तीसाठी भागवत ऐकावे. म्हणून आपण संतांच्या वचनाच्या मागे ओढले गेलो पाहिजे. जीवन समृद्ध कसे करता येईल. याचा विचार करण्यासाठी ही कथा आहे. एवढेच नव्हे तर विचाराकडे प्रवृत्त व्हावे याकरिता भागवत कथा आहे. भागवत म्हणजे भगवंताची वाङ्मय मूर्ती. एवढेच नव्हे तर शब्दरूप परमात्मा म्हणजेच भागवत कथा होय. मनुष्य जन्मात परमात्मा प्राप्ती शिवाय दुसरे ध्येय नाही. भगवान शुकाचार्य व भगवान व्यासांच्या मुखातून निघालेले हे शब्द आहेत. मोठ्यांच्या विचारातून निघालेली सामान्य शब्द देखील, सामान्यातील सामान्याला मोठे करू शकतात. शंतनू पाठक व संचाने भजनाची साथ दिली. प्रा.संजय पिंपळगावकर यांनी सूत्रसंचालन केले, तर जवळेकर परिवाराच्या सामुहिक आरती झाली. दररोज सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत कथा होणार आहे. रविवारी ४ मेरोजी दुपारी भागवत कथेचा समारोप आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जवळेकर परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.
जीवन समृद्ध करणारी कथा
कथेच्या प्रारंभी भागवत कथा म्हणजे नेमके काय आहे? ही कथा का ऐकावी? हे सांगताना ते म्हणाले की, श्रीमद् भागवत कथा श्रवण, पठण व पारायण कोणतीही सेवा मानवी जीवनाला कृतार्थ करणारी आहे. भगवान श्रीकृष्णाचे चरित्र सांगणारे एक पुराण आहे. कथेचा विचार करताना एक कथा म्हणून न पाहता, भगवंताच्या चरित्र श्रावणाबरोबर मानवी जीवनाचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी हे चरित्र आहे. या कथेत भगवंतांनी आपणास संयम शिकवला आहे. संयम आणि उत्स्फूर्तता हे दोनही मानवी गुण आहेत. उस्फूर्तता हा नैसर्गिक गुण आहे. तर संयम हा वैचारिक गुण आहे. भागवत कथा ही आचार विचारांची आचारसंहिता आहे. मनात जो विचार आला त्याचा आम्ही विचार करावा, मनात आले म्हणून लगेच करू नये. कारण माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेले अविवेक अनेक आपत्तींना जन्म देत असतात. त्यामुळे संयम असणे गरजेचे आहे. भागवत कथा ही गोष्टींमध्ये रमणारी कथा नाही. प्रसंगात अडकणारी कथा नाही. घटनांच्या मागे असलेल्या वृत्तीचे चिंतन करणे हा या कथेचा उद्देश आहे. घटनांच्या मागे घडलेली मनोवृत्ती काय आहे ? मानवी जीवन कसे असले पाहिजे ? आम्हाला बदलण्यासाठी काहीतरी करावे लागेल. विचाराने आमचे जीवन समृद्ध कसे करता येईल. याचा विचार करण्यासाठी ही कथा आहे. एवढेच नव्हे तर विचाराकडे प्रवृत्त व्हावे याकरिता भागवत कथा आहे. वृत्ती विचारातून व विचार मंथनातून माणसाला जे प्राप्त होते ते यातून शिकण्यासाठी ही कथा आहे, असेही देगलूरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
भागवत कथा का ऐकावी?
मानवी जीवनामध्ये का ? हा प्रश्न निर्माण होत नसेल तर ,आमचे जीवन यांत्रिक समजावे. यंत्र आणि मानव यामध्ये अंतर आहे. प्रत्येक क्रिया करताना प्रश्न निर्माण झाला पाहिजे. कशाकरिता? वृत्ती विचार जोपर्यंत आपल्याला कळत नाही. तोपर्यंत कथा ऐकण्याला अर्थ उरत नाही. ग्रंथामध्ये सांगितलेले प्रयोजन हे वक्त्यासाठी असते. तर ग्रंथामध्ये सांगितलेली फलश्रुती ही श्रोत्यांसाठी असते. माणसांनी आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा विचार प्राप्त झाला की, ध्येय निश्चिती केली पाहिजे. आपले जगण्याचे उद्दिष्टे काय ? हे ठरवले पाहिजे. आम्हाला आमच्या जीवनाची ध्येय निश्चिती कळली पाहिजेत. आमच्या जीवनाला ध्येय निश्चिती असलीच पाहिजे. कारण निश्चयात्मक भूमिकेचा अभाव जीवनात निर्माण झाला तर ,जीवन अस्थिर होते. अस्थिर जीवन कधीही समाधान देऊ शकत नाही. स्थिर विचार समाधानाचे माध्यम आहे. विचाराशिवाय जीवनामध्ये समाधान नाही. मनाने बुद्धीच्या मागे गेले पाहिजे. त्या उलट बुद्धीने मनाच्या मागे जाऊ नये. कोणी कोणाच्या मागे जावे हे देखील कळले पाहिजे. सुनीती जेव्हा सुरू होते. त्यामुळे तिच्या ठिकाणी निषिद्ध कर्म व निषिद्ध विचार निर्माण होत नाहीत. उगम पावलेल्या नदीला समुद्राशिवाय दुसरे ध्येय नसते.
प्रतिबंध एक संधी
ध्येयप्राप्ती जीवनाचे भूषण ठरले पाहिजे. साध्य प्राप्ती करता ध्येय एकमेव मार्ग असतो. त्या साध्याला त्या साध्याची प्राप्ती करताना प्रतिबंधाला अनुकूल बनवून कसे घ्यायचे यासाठी भागवत कथा आहे. आपल्याला जीवनात आडवे येणारे स्वजनच असतात. प्रतिबंध हे बाहेरून येतच नाहीत. त्यामुळे प्रतिबंधाला एक संधी म्हणून बघता आले की, भागवत कळेल. निर्माण झालेल्या प्रतिबंधाला संधी म्हणून बनवावे. असे झाले तर आपले स्वजनच आपला परमार्थाचा प्रवास सोपा करतील, ध्येय निश्चितीसाठी भागवत ऐकावे. ध्येय निश्चित झाल्यानंतर नियत साधनांच्या प्राप्तीसाठी भागवत ऐकावे. भागवत भक्ती हे नियत साधन आहे. विचाराने साधनांशी एकरूप झाले पाहिजे. दृष्टी साध्यावर असून वृत्ती साध्याशी एकरूप होणे गरजेचे आहे. यासाठी साध्याच्या परिणामाची जाणीव होणे गरजेचे आहे. अंत:करण नित्य जागृत ठेवून साधनेत सातत्य जपले गेले पाहिजे. कारण साधनाला भक्तीमध्ये दोनच पावले आहेत. एक सातत्य दुसरे पाऊल म्हणजे विश्वास. त्यामुळे प्रत्येकाकडे सातत्य आणि विश्वास असणे गरजेचे आहे. वेदांता पासून संत साहित्यापर्यंत जीवनाला धन्य करणारी प्रणाली समान आहे.
जसे वेदांत कर्म, ज्ञान व भक्ती या तीन कांडांमध्ये विभागलेले आहे तसेच गीता, भागवत, रामायण व महाभारत हे देखील तीन कांडांमध्ये विभागलेले आहेत. कांड म्हणजे तुकडे. ज्ञान ही जीवनाची गरज आहे. कर्म, ज्ञान व उपासनेला नेहमी श्रद्धेची जोड आवश्यक असते. माणसाचे जीवन देखील तीन कांडात विभागलेले विभागले गेलेले आहे. ज्ञान,कर्म व उपासना या तीन कांडांना श्रद्धेची जोड देणे गरजेचे आहे, असेही देगलूरकर यांनी स्पष्ट केले .
ज्ञानाने परिपूर्ण करणारा ग्रंथ
कर्माची अगतिकता, ज्ञानाची भूक, भक्तीची ओढ ,ज्याला असते त्याला जीव म्हणतात. भागवत कथा ही विचाराने समृद्ध करणारी कथा आहे. एवढेच नव्हे तर ज्ञानाने परिपूर्ण करणारा ग्रंथ म्हणजे भागवत आहे. भागवत पुण्य देणारा ग्रंथ नक्कीच आहे. भगवान आणि भक्ताचा जीवन प्रवाह ,विचार प्रवाह म्हणजे भागवत कथा आहे. जीवन कसे जगावे हे शिकवणारा ग्रंथ म्हणजे भागवत आहे. जीवन जगताना प्रबळ व अप्रबळ असे दोन प्रतिबंध कायम येत असतात .ज्यांना आपण टाळू शकतो, असे अप्रबल प्रतिबंध असतात तर जे प्रतिबंध प्रयत्नाने दूर करता येतात असे प्रबल प्रतिबंध असतात. प्रबल प्रतिबंध प्रयत्नाने निवृत्त होतात. मात्र यासाठी भगवान कृपेची गरज असते भगवान कृपेशिवाय जे निवृत्त होत नाहीत त्यांना प्रबल प्रतिबंध म्हणतात. प्रतिबंधामध्ये माणसाने कोणत्या विचाराने वागावे यासाठी भागवत श्रवण करणे गरजेचे आहे. अस्थिर झालेल्या परिस्थितीमध्ये विचाराने स्थिर राहण्यासाठी भागवत कथा गरजेची आहे. कारण संसार नावाच्या रोगावर विचार हेच औषध आहे. भागवत कथा आम्हाला कसे वागू नये? व कसे वागावे ? हे दोन्ही शिकवते. त्याचबरोबर गोपीगीताच्या श्रवणाने तर हृदयरोग देखील दूर होतात.
आत्महत्या केलेले चरित्र नाही
रामायण व भागवत कथेमध्ये एकही चरित्र असे नाही की, ज्याने आत्महत्या केली आहे. त्या उलट सुखाने आणि सत्तेने उन्मत्त झालेली अनेक चरित्र भागवतामध्ये आहेत. जगतामध्ये उन्मत्तता भगवान टिकू देत नाहीत. कसे घडले ? हा प्रश्न जिथे निर्माण होतो ती कथा असते. इतिहासाला जोडून प्रश्नाचे उत्तर म्हणजे कथा होय. भागवत कथेची मांडणी दोन शैलीमध्ये केली आहे. एक भाषा शैली व दुसरी रचना शैली. म्हणून याला शब्दरूप परमात्मा म्हटले जाते. परीक्षितेला शापातून मुक्ती मिळण्यासाठी भागवत कथा आहे.
मरणापासून नव्हे तर मरणाचे भय दूर होण्याकरता भागवत कथा आहे. मरण निवृत्त करणे हे भागवत कथेचे काम नाही. मरणाचे भय निवृत्त करण्यासाठी भागवत कथा आहे. शब्दातून व्यक्त झालेल्या शापाला कृतीतून उत्तर देता येत नाही. कारण शब्दाला शब्दाने उत्तर दिले जाते. जसा रोग तसे औषध वापरावे लागते. म्हणून भागवत कथा ही शब्द रूप अविष्कार आहे; तसेच यमुना ही तीर्थरूप अविष्कार आहे. गोवर्धन हे पृथ्वी रूप अविष्कार आहे. वाणी हाच विचार आहे. विकार शब्दाने निर्माण होतात. वाचा माणसाला अधि:पतनाला नेते. शब्दाने निर्माण झालेला प्रतिबंध शब्दानेच दूर करता येतो. त्यामुळे शब्दरूपाने निर्माण झालेला परमात्मा म्हणजे भागवत कथा होय. भक्ताच्या रक्षणाकरिता शब्द रूपाने प्रकट झालेले भगवान म्हणजे भागवत कथा होय, असेही सद्गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी स्पष्ट केले. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. भागवत कथेचा समारोप रविवार, ४ मे रोजी होणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड.किशोर जवळेकर यांनी केले आहे.
वृत्तसंकलन – श्रीपाद कुलकर्णी