घातक अहंकाराचा त्याग आवश्यक : सद्गुरु चैतन्य महाराज देगलूरकर

घातक अहंकाराचा त्याग आवश्यक : सद्गुरु चैतन्य महाराज देगलूरकर

श्रीमद् भागवत कथेला श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद, रविवारी सांगता 

श्रीपाद कुलकर्णी

सेलू : मानवाच्या मनामध्ये क्रोध व्यक्त झाला तर तो दोष आहे. मात्र तो दोष आहे असं वाटतच नाही. कारण दुर्गुणांचे लक्षण ते निर्माण होतात त्यावेळी सूक्ष्म असतात, व्यक्त होतात त्यावेळी मोठेपणा वाटतो. मात्र परिणामांच्या वेळी त्यांची जाणीव होते. मी शब्द देखील खूप सूक्ष्म आहे. त्याची जाणीव होत नाही .ज्यावेळी जाणीव होते त्यावेळी परिणामांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच अहंकाराचा त्याग करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. कारण अहंकार नरकात लोटून देतो. अहंकाराचा त्याग करून तो देवाला समर्पण करा. कारण अहंकार खूप घातक असल्याचे प्रतिपादन सद्गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी आशीर्वचन पर बोलताना केले आहे.

ते येथील ॲड किशोर जवळेकर व सौ.मंजुषा जवळेकर यांनी आयोजित केलेल्या भागवत कथेतील तिसरे पुष्पगुंफताना बुधवार ३० एप्रिल रोजी ,साई मंदिर सभागृहात बोलत होते. भागवत कथेचे विस्तृत विवेचन करताना ते म्हणाले की ,अहंकार नसण्याचा सुद्धा अहंकार असतो. विकार नेहमी अनुकूल प्रसंगाची वाट बघत असतात .सद्गुण अनुकूल प्रसंगात लपून राहतात. वातावरणाची अनुकूलता झाली की बीजाचा वटवृक्ष व्हायला वेळ लागत नाही. अहंकाराचा त्रास प्रत्यक्ष भगवान शुक्राचार्यांना देखील झालेला आहे. त्यामुळे आपल्यासारख्यांचे काय ? भगवान व्यासांनी शुकाचार्र्‍यांना राजा जनकाकडे पाठवले. जनक सामान्य नाहीत .जनक ही एक पदवी असून मिथिलेच्या राजाला मिळालेली पदवी आहे. आज पर्यंत ४२ हजार जनक जीवन मुक्त झाले आहेत .भगवान शुकाचार्य जनक राजाकडे गेल्यानंतर त्यांचा अहंकार दूर झाला. वृत्ती अंत:र्मुख झाली की दोष दिसायला लागतात. अहंकार गळायला लागतात. कोणत्याही गोष्टीचा संघ चांगला नाही. वस्त्रांचा, संपत्तीचा, विकारांचा ,विचारांचा ,संघ देखील घातक आहे .त्यामुळे राजा जनकाने भगवान शुकाचार्य यांना संघ टाका सुखी व्हा. असा मोलाचा मंत्र दिला. त्या मंत्रामुळे भगवान शुकाचार्य यांचा अहंकार गळून पडला .अहंकार जोपर्यंत आहे ,तोपर्यंत आम्ही जगाला प्रिय होऊ शकत नाही .आपल्या कल्याणाच्या भूमिका आपल्याला संताकडून ऐकावे लागतात .त्यावेळी स्तुती स्तवन व सेवा करावी लागते .मोठ्यांच्या भूमिका ऐकण्यासाठी सेवा करावी लागते .असेही सद्गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी यावेळी आशीर्वचन पर बोलताना स्पष्ट केले. भागवतकथेचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय पिंपळगावकर यांनी केले. तर भजनाची साथ शंतनू पाठक व संच यांनी दिली.

ज्ञान वैराग्य जागृतीसाठी भागवत ऐकावे

ज्ञान ही निर्माण होणारी गोष्ट नाही. जागृत होणारी गोष्ट आहे .आपल्याकडे आपण देवाला व संताला देखील जागे करतो .अगदी त्याचप्रमाणे ज्ञानाला जागे करावे लागते. ज्ञानाची निर्मिती नाही .निर्मिती झाली की कार्य झाले. आणि कार्य हे नश्वर असते. ज्ञान नष्ट होत नाही म्हणून त्याला जागे करावे लागते. आणि त्याला जागे करण्यासाठी भागवत कथा ऐकावी .भागवत कथा ऐकल्याने ज्ञान व वैराग्य जागृत होत असल्याचे प्रतिपादन आशीर्वचनपर बोलताना सद्गुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले आहे .

ते म्हणाले की भक्ती ज्ञान वैराग्य माणसाच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. यामुळे विवेक वाढतो. विवेक प्राप्त झाला की मनुष्य माया मोहातून मुक्त होतो .संतांचे वैराग्य विवेकातून निर्माण झालेले असते .साधनांचा विनियोग कळत नाही .त्यामुळे साधनांचा विनियोग कळला पाहिजे. विनीयोग कळला नाही तर उपलब्ध साधनांची किंमत शून्य होत असते. देवानी आपल्या कल्याणासाठी मानवी देह, बुद्धी व भावना दिलेल्या आहेत .या साधनांनी आम्हाला संपन्न केलेले आहे .भगवंतांनी माणसाला दिलेली सर्वोत्तम भेट म्हणजे बुद्धी होय .बुद्धीच्या निश्चयाने आत्मज्ञान होते. देवाचे अनंत उपकार आहेत. आपणाला बुद्धी मिळाली . साधना संपत्ती मिळालेली आहे .पण त्याचा विनियोग झाला पाहिजे. हे घोर कलियुग असल्याने विचारांचे रूप घेऊन विकार डोक्यामध्ये शिरलेले असतात. कुठल्याही पदार्थाचे गुणदोष हे प्रवृत्तीच्या निवृ त्तिसाठी सांगितले जातात. पुण्याकडे प्रवृत्ती व्हावी आणि पापाची निवृत्ती व्हावी . प्रवृत्ती ही महात्म्य व्हावी .आपली भगवंताकडे प्रवृत्ती वाढावी. म्हणून ग्रंथाच्या अभ्यासाने विद्वान होता येते. भक्त होता येत नाही .ग्रंथाची उपासना केली पाहिजे. भगवान व्यासांच्या मते भगवंताच्या पूजा मध्ये भक्ती आहे. आचार्य गर्दाचार्यांच्या मते भगवंताच्या कथेमध्ये भक्ती आहे. शांडील्ल्याच्या मते आत्मरती विरोधामध्ये भक्ती आहे . मात्र महर्षी नारदांच्या मते ,आपला सगळा आचार भगवंताला समर्पित करणे ,भगवंताच्या विरहाने व्याकुळ होणे, यामध्ये भक्ती आहे. जीवाचे दैन्य दूर करण्याकरिता भगवान शुकाचार्यांनी हे भागवत परीक्षिती राजांना दिले आहे .अमृता पेक्षाही भागवत कथा सरस आहे. परीक्षिती राजांना मिळालेला सात दिवसात मरण्याचा श्याप चुकविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले . त्यात भगवान शुकाचार्यांनी सात दिवस भागवत ऐकवले. स्वर्गातील सर्व देव देवतांना ही माहिती मिळाली. त्यावेळी परीक्षिती राजाचे मरण निवृत्त करण्यासाठी स्वर्गातील देवता भगवान शुकाचार्याकडे अमृत घेऊन आले व त्यांनी आम्ही परीक्षिती राजाला अमृत देत आहोत, तुम्ही आम्हाला भागवत कथा द्यावी असे सूचित केले. त्यावेळी भगवान शुकाचार्यांनी भागवत कथा व अमृताची कोठेही तुलना होत नसल्याचे सांगितले. भागवत कथेचे महत्व कितीतरी पटीत अमृता पेक्षाही महान आहे . हे प्रत्यक्ष भगवान शुकाचार्य यांनी सांगितले ,असल्याने भागवत कथा सांगताना वक्त्यांनी, कोणाकडूनही काही मागणी करू नये. कारण भागवत कथेची तुलना इतर कशासोबतही होत नाही .मृत्यू लोकातील जीव साधनेने साधनापर्यंत पोहोचवत असतात. कोणतेही साधन क्षणात साधने पर्यंत पोहोचवत असेल तर ,व्याभिचार किंवा भ्रष्टाचार होत असतात .परमार्थिक साधनक्षणाचे नसतात. दुर्लभ असणारी वस्तू दिली तरी त्याच्या मोबदल्यात भागवत कथा देऊ नये. कारण अमृत दिले तरी त्याची तुलना भागवताची होत नाही .ज्ञान आणि वैराग्य हे भक्तीच्या पोटी जन्माला आले .मोक्ष भक्तीचा दास आहे. तर मुक्ती भक्तीची दासी असल्याचे प्रतिपादन सद्गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी आर्शिवचनपर बोलताना केले आहे.

प्रारब्ध व प्रयत्न यांचे भांडण

प्रारब्ध आणि प्रयत्न यांचे भांडण अगदी सनातन काळापासून आहे. माणसाने प्रयत्न करावे. प्रयत्नचे फळ प्रारब्धावर सोडून द्यावे .फळ मिळाले तरी समाधान. तसेच नाही फळ मिळाले तरी समाधान मानावे .

अप्राप्ती नैराश्य निर्माण करते. एवढेच नव्हे तर अप्राप्तीचा विचार देखील नैराश्य प्राप्त करते. नसलेल्याचा मोह अंत:करणात धारण करू नये .त्यामुळे जीवनाचे अध्य:पतन होते. आत्मदेवांनी पुत्रप्राप्तीच्या अट्टहासापायी स्वतःचे कसे अध:पतन केले . हे सांगताना ते म्हणाले की, माणसाने नसलेल्या गोष्टीचा मोह करू नये. माणसाने कायम संन्यस्थ वृत्तीने राहिल्याने सगळी सुख आपल्या पायाजवळ येत असतात. संतती उत्पत्ती करता विवाह नाही. तर कामावर विजय मिळवण्यासाठी विवाह असतो .काम निवृत्ती करिता विवाह संस्कार असतात .काम विकाराला आळा घालण्यासाठी विवाह संस्कार असतात. आजच्या घोर कलियुगात जवळजवळ सगळे संस्कार संपलेलेच आहेत. मात्र नाईलाजाने फक्त अंत्यसंस्कार राहिलेला आहे .सगळ्याचगोष्टींचा त्याग करण्याकरीता, माणसाला घरात बसून अरण्याचे सुख प्राप्त करून घेता आले पाहिजे .असे नाही झाले तर त्या घराचे अरण्य व्हायला वेळ लागत नाही .त्यागामध्ये सुख असते. भोगामध्ये कायम दुःख असते .त्यामुळे विरक्त होण्यातच जीवनाची धन्यता आहे .देव आपल्याला सगळे देतो पण बघत असतो की, हा कधी सोडतो . हा सोडत नसेल तर , देव पुढच्या जन्माची व्यवस्था करत असतो. संतती नाही हे प्रारब्ध असते. मात्र प्रारब्ध बदलता येत नाही .प्रारब्ध भोगाने संपवता येते .माणसाला जोपर्यंत ज्ञान किंवा दुःख प्राप्त होत नाही ,तोपर्यंत माणसाकडून परमार्थ होत नाही .निषिद्ध व्यवहारासाठी काळाची मर्यादा असते .धुंधूकारी हा प्रेत योनीत राहू लागल्याने त्यातून मुक्तता होण्यासाठी गोकर्णाने त्याला भागवत कथा ऐकवली .भागवत कथा श्रवण केल्यामुळे धुंधूकारीची प्रेत योनीतून सुटका झाली .भागवत कथा सगळे श्रवण करतात. मात्र मनन कोणीच करत नाही . त्यामुळे कथा श्रवण सोबतच ती मनन देखील केली पाहिजे. तरच त्या कथेचा लाभ घेता येतो. गुरु वाक्यावर पूर्ण विश्वास ठेवून ऐकले पाहिजे. मला काही कळत नाही असं समजून ऐकले पाहिजे .आपल्या ठिकाणी दीनत्व भावना आली पाहिजे .ईश्वराला दीनत्व आवडते .दैन्य आवडते .एकाग्रचित्ताने श्रवण केले पाहिजे .कथेमध्ये निश्चलमती असली पाहिजे. जे आपल्या जीवनामध्ये विघातक न होता विधायक होतात , त्याला विधी असे म्हणतात. विधीचे तीन प्रकार आहेत .अपूर्व विधी, नियम विधी ,परिसंख्या विधी. मात्र भागवताची कथा ही नियम विधीने श्रवण केली पाहिजे. ज्याला ऐकण्याचा निश्चय होतो ,त्याला अवधान म्हणतात. ऐकण्याच्या व मननाच्या योग्यतेचा फक्त आत्माच आहे .श्रवण हा नियम निधी आहे .त्यामुळे प्रत्येकाने भागवत कथा ही नियमाने ऐकली तर निश्चित फलश्रुती मिळते ,असे प्रतिपादन सद्गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी यावेळी आशीर्वचन पर बोलताना केले आहे. भागवत कथेचा समारोप रविवार ०४ मे रोजी होणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी कथा श्रवणाचा लाभ घेण्याचे आवाहान एडवोकेट किशोर जवळेकर यांनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!