काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेला उत्साहात सुरूवात
परभणीत संविधान बचाव सभेचे आयोजन
परभणी : एकता आणि बंधुतेचा संदेश देत महाराष्ट्रातील जनतेची मने जोडण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्यात आयोजित दोन दिवशीय सद्भावना व संविधान बचाव पदयात्रेस रविवारी, ४ मे रोजी जिल्ह्यातील नृसिंह पोखर्णी येथून उत्साहात सुरुवात झाली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री नितीन राऊत, खासदार रवींद्र चव्हाण, खासदार कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर आदींसह सेलूचे माजी नगराध्यक्ष पवन आडळकर जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले आहेत. सकाळसत्रात यात्रा शिंगणापूर फाटा येथे तर दुपार भोजनाची आणि निवासाची व्यवस्था रोकडोबा मंदीर येथे करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात ही पदयात्रा तरोडा नाका येथून सुरू होऊन माहेर मंगल कार्यालय, गंगाखेड रस्ता येथे मुक्कामी राहिली. सोमवारी, ५ मेरोजी राजीव भवन, शनिवार बाजार येथून पदयात्रा सुरू होऊन दुपारी १२ वाजता अक्षदा मंगल कार्यालय येथे पोहोचणार आहे. येथे सद्भावना संविधान बचाव सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांनी केले आहे.