सौर प्रकल्प जलदगतीने पूर्ण करावेत
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे निर्देश
परभणी : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडीत वीज पुरवठा करणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून परभणी जिल्ह्यात या योजनेतंर्गत सुरु असणारे प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देश राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महावितरणचे अधिकारी व प्रकल्प विकासकांना दिले.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेबाबत जिल्ह्यातील स्थितीचा आढावा पालकमंत्री यांनी सोमवारी, ५ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अनुराधा ढालकरी, मुख्य अभियंता आर.बी.माने, आर.के. टेंभुर्णे, एम.पी.वग्याणी, जी.के. गाडेकर आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तर व्हीसीव्दारे महावितरणचे संचालक, यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले की, परभणी जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजनेतंर्गत एकूण ६५ उपकेंद्र मंजूर झाले आहेत. यातून सुमारे २५५ मे. वॅट सौर वीजनिर्मिती होणार आहे. या प्रकल्पांसाठी एक हजार २७५ एकर जागा लागणार आहे. १६ उपकेंद्रांना शंभर टक्के जागा मिळाली आहे, तर २६ उपकेंद्रांना अंशत: जमीन मिळालेली आहे. इतर उपकेंद्रांना जमीन मिळण्याची कार्यवाही सुरु आहे.
गंगाखेड तालुक्यात ९ उपकेंद्र, पालम ४, परभणी १५, पूर्णा ९ आणि सेलू विभागातील जिंतूर तालुक्यात ९, मानवत ६, पाथरी ६, सेलू ३ व सोनपेठ ४ असे एकूण ६५ उपकेंद्रांची संख्या आहे. योजनेत कुठल्याही प्रकारे दिरंगाई करु नये. प्रशासनाने जमिनीशी संबंधित कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करावी. पावसाळ्यापूर्वी प्रकल्पांचे बहुतांश काम पूर्ण करणे आवश्यक आहे, असे सांगितले. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, सोलार सिटी, सोलार व्हीलेज, शासकीय कार्यालयाच्या छतावर सोलर पॅनल बसविण्याच्या स्थितीचाही आढावा पालकमंत्र्यांनी घेतला.