जातीनिहाय जनगणना म्हणजे काँग्रेसचा विजय
रमेश चेन्नीथला यांचे मत : सद्भावना व संविधान पदयात्रेचा परभणीत समारोप
परभणी : जाती निहाय जनगणनेचा केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सातत्याने लावून धरलेल्या मागणीचा विजय होय, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सोमवारी, ५ मेरोजी परभणीत व्यक्त केले.
काँग्रेस पक्षाच्यावतीने परभणी जिल्ह्यात काढण्यात आलेल्या दोन दिवसीय सद्भावना पदयात्रा आणि संविधान बचाव सभेनिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री.रमेश चेन्नीथला बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार, राज्यसभा सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार प्रणिती शिंदे, खासदार रवींद्र चव्हाण, खासदार कल्याण काळे, काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी आरिफ नसीम खान आदींसह कॉंग्रेसचे नेते, पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सद्भावना पदयात्रा हा उपक्रम पक्षास उभारी देणारा तसेच काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीसह आगामी निवडणूकांच्या दृष्टीने पूरक ठरले, असा विश्वास श्री. चेन्नीथला व्यक्त केला. यावेळी केंद्र सरकारवर जोरदार टिका टिप्पणी करतेवेळी चेन्नीथला यांनी पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या दबावामुळेच मोदी सरकारने जातीय जनगणनेचा निर्णय घेतला आहे, असे स्पष्ट केले. जाती निहाय जनगणना मोदी सरकारने तात्काळ सुरू करून त्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
श्री.सपकाळ यांनीही भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने काँग्रेसजणांचाच पक्षप्रवेश करीत काँग्रेसजणांच्या बळावरच आतापर्यंत निवडणूका जिंकल्या आहेत. काँग्रेसच्या लोकांशिवाय भाजपास निवडणूक जिंकता येत नाही, हे वास्तव आहे. भाजपातील अर्ध्यापेक्षा अधिक लोकप्रतिनिधी व नेते हे पूर्वाश्रमीत काँग्रेसजण आहेत, असे स्पष्ट करीत सपकाळ यांनी भाजप म्हणजे काँग्रेसचे लोक चोरणारी चेटकीण असल्याचा गंभीर आरोप केला. दरम्यान, यावेळी खासदार प्रणिती शिंदे, आमदार विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी आपल्या भाषणातून कॉंग्रेस पक्षाची ध्येय धोरणे, पक्षाचे आगामी कार्यक्रम याविषयी संवाद साधला. सभेला पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.