विकसित कृषी संकल्प अभियानाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

विकसित कृषी संकल्प अभियानाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘विकसित भारता’च्या संकल्पनेला गती देण्यासाठी, आधुनिक कृषी पद्धती, समृद्ध शेतकरी आणि विज्ञानाधिष्ठित शेती आवश्यक आहे. कृषी क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, अन्नसुरक्षेसोबतच देशाच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला रोजगार पुरवते. याकरिता, केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या दूरदृष्टी नेतृत्वात, २९ मे ते १२ जून २०२५ दरम्यान देशभरात “विकसित कृषी संकल्प अभियान” राबविण्यात येणार आहे. या राष्ट्रव्यापी अभियानाचा शुभारंभ २९ मे रोजी झाला. महाराष्ट्रामध्ये या अभियानाचा शुभारंभ परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियानाच्या चित्ररथ वाहनाला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, कामगार राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे अभियान यशस्वी होवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरीप पिकाच्या नियोजनासाठी अचूक मार्गदर्शन मिळेल. शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने लाभत असून त्यांना शाश्वत उत्पादन घेता येईल, असे नमूद करून शुभेच्छा दिल्या.
या वेळी खासदार संजय जाधव, विधान परिषद सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य सतीश चव्हाण, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, प्रवीण देशमुख, डॉ.आदिती सारडा, भागवत देवसरकर, महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव (कृषी) विकासचंद्र रस्तोगी, पुणे येथील कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, पोकराचे प्रकल्प संचालक परिमल सिंह, वनामकृविचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, कुलगुरू डॉ. शरद गडाख, कुलगुरू डॉ. संजय भावे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, पुणे येथील अटारीचे तुषार अत्रे, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक डॉ. अजय चंदनवाले, प्रगतशील शेतकरी दादा लाड, कृषी परिषदेचे सदस्य विवेक दामले, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. प्रशांत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ देण्याचे लक्ष्य

भारतीय कृषी अनुसंधान परिषद अभियान राबवण्यासाठी शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी परिश्रम घेत आहे. या अभियानामध्ये देशातील ७२३ जिल्ह्यांमधील ६५,००० पेक्षा जास्त गावांना भेट देणाऱ्या २,१७० तज्ज्ञ पथके सहभागी होणार आहेत. प्रत्येक पथकात किमान चार वैज्ञानिक असतील. या पथकांमध्ये कृषी विद्यापीठांचे वैज्ञानिक, संशोधन संस्थांचे तज्ज्ञ, शासकीय विभागांचे अधिकारी, नाविन्यपूर्ण कार्य करणारे शेतकरी आणि एफपीओचे कर्मचारी यांचा समावेश असेल. या अभियानाद्वारे देशातील १.३ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यात हे अभियान कृषी विभाग आणि ५० कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून ४५०० गावांत राबवले जाणार आहे. मराठवाडा विभागासाठी कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आठ जिल्ह्यांतील १२ कृषी विज्ञान केंद्रे आणि सर्व विस्तार यंत्रणा सक्रिय सहभागी होणार आहेत. या उपक्रमासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे आणि मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठस्तरीय सूक्ष्म नियोजन केले असून यासाठी शास्त्रज्ञांचे चमू तयार केले आहेत. याद्वारे प्रत्येक गावात २०० शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून जवळपास २०१६०० शेतकऱ्यांपर्यंत खरीप पिकाचे अचूक नियोजन करण्यासाठी तंत्रज्ञान पोहोचविण्यात येणार असून त्यांच्याद्वारे संपूर्ण परिसरात ते तंत्रज्ञान पोहोचले जाईल.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!