
डॉ.संजय रोडगे यांचे प्रतिपादन, ‘विद्याविहार’ परिसरात शंभरावर वृक्ष लागवड
परभणी : सजीव असो, वा निर्जीव; पर्यावरणाच्या बहुतेक सर्वच घटकांमध्ये वाढत चाललेला मानवी हस्तक्षेप चिंताजनक असून, तो थांबविण्यासाठी सर्वजण सजग राहू, असे प्रतिपादन शिक्षणाचे अभ्यासक तथा श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी व्यक्त केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सेलू (जि.परभणी) येथील श्रीराम प्रतिष्ठानमध्ये रविवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मोरेगाव येथील पांडुरंग विद्यालयाचे अध्यक्ष डॉ.अरविंद बोराडे, मिलिंद सावंत, रामराव बोबडे, रामराव गायकवाड, अशोक अंभोरे, जयसिंग शेळके, पवन घुमरे, कृष्णा काटे आदींची उपस्थिती होती.
डॉ.रोडगे म्हणाले, ” पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे, विविध समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरण पूरक निर्णय घेऊन पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे. वाढता मानवी हस्तक्षेप पर्यावरणासाठी घातक आहे. तो थांबविण्यासाठी पर्यावरणीय आपत्तीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन व त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी शिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.”
यानिमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटनांचे पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. विद्याविहार संकुल परिसरात साग, आंबा, चिंच, आवळा आदी जातींच्या शंभरावर वृक्ष लागवड करण्यात आली. सूत्रसंचालन संजय ठाकर यांनी केले.