अन्नप्रक्रिया उद्योगवाढीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे प्रतिपादन
परभणी : परभणी जिल्ह्यातील कृषि क्षेत्रात उत्पादनवाढीबरोबरच शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अन्न प्रक्रिया उद्योगवाढीवर विशेष भर देण्यात येणार असून, यासाठी शासन, प्रशासन आणि उद्योजकांनी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे १४ जून रोजी आयोजित ‘पिकनिहाय संशोधक कार्यरत उद्योजक बैठकी’त त्या बोलत होत्या. या बैठकीस कुलगुरू डॉ. इंद्र मणि, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय मारिवाला, उद्योजक रावसाहेब घुगे, प्रा. डॉ. आर. बी. क्षीरसागर आणि संचालक संशोधन डॉ. खिजर बेग आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, “परभणी जिल्हा अन्न प्रक्रिया उद्योगासाठी अनुकूल असून येथे दूध, रेशीम, फळे, मिरची, झेंडू, टोमॅटो आदी कच्चा माल विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे अमूल, मदर डेअरी, रामदेवबाबा आदी नामवंत कंपन्यांशी संपर्क साधून दुधावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”
“‘सिल्क टू मिल्क’ या संकल्पनेतून तुतीपासून रेशीम धागा आणि दुधापासून दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करून मूल्यवर्धनाची साखळी निर्माण करणार आहोत. शेतकऱ्यांनी केवळ प्राथमिक उत्पादनावर थांबू नये तर प्रक्रिया उद्योगात उतरावे, यासाठी जनजागृती करण्यात येणार असून, सोबतच त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे,” असेही त्या म्हणाल्या. फळप्रक्रिया, टोमॅटो सॉस, चटणी, मिरची कांडप, झेंडू प्रक्रिया उद्योग यासारख्या गृहउद्योगांना चालना देण्यासाठी गुंतवणूकदारांना परभणीत आमंत्रित करण्यात येईल. स्थानिक उद्योजक व शेतकऱ्यांना योग्य मार्केटिंगसह उत्पादनवाढीसाठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘अन्न प्रक्रिया उद्योगासाठी परभणी जिल्हा सक्षम असून, येथे जागा, मनुष्यबळ, कच्चा माल, उद्योजक आणि गुंतवणूक यांचा समतोल आहे. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या उद्योग शाखांसाठी परभणीला प्राधान्य द्यावे, यासाठी लवकरच विशेष बैठक घेण्यात येईल,’ असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
संजय मारिवाला यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात गुणवत्ता व प्रमाणवाढीवर भर देण्याचे महत्त्व स्पष्ट केले. कुलगुरू इंद्र मणि यांनी स्थानिक उद्योजकांनी फूड प्रोसेसिंग, उत्पादनात मूल्यवर्धन करून मार्केटींगमध्ये विशेष लक्ष घालणे आवश्यक आहे. स्थानिक तरुणांमध्ये याबाबत जागरुकता आणण्याची गरज बोलून दाखविली. येथे मोठ्या उद्योगनिर्मितीचे ध्येय ठेवूनच काम करणे आवश्यक आहे. येथे मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारणीच्या संधी आहेत, असे सांगितले. यावेळी शेतकरी केद्रस्थानी ठेवून विविध उपक्रमांचे, शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी हे बदलत्या आणि प्रयोगशिल कृषि उद्योगस्नेही परभणीचे द्योतक असल्याचे सांगितले. कच्च्या मालावर आधारित प्रक्रिया युनिट्सची उभारणी, मार्केटिंग, प्रशिक्षण व संशोधनावर भर देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले.
या बैठकीस जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कृषी संशोधक व उद्योजक आशिष श्रीवास्तव, संदीप माळी, किरण वाघ पाटील, सुहास गोडगे, डॉ. उमेश कांबळे, जश मिराणी, उपेंद्र शाह, प्रसाद जोशी, तसेच पीएनपीचे संचालक नवनाथ बारहाते उपस्थित होते.