जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले चिमुकल्यांचे स्वागत
सिंगणापूर येथील शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात
परभणी : सिंगणापूर येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत सोमवारी (दि.१६) शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी इयत्ता पहिलीला प्रवेश झालेल्या मुलांचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उज्ज्वल भारताचे भविष्य आणि उद्याचे सुजाण नागरिक घडविणाऱ्या शाळांच्या माध्यमातून अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि सामाजिक विकासदेखील साधला जावा, असे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी या वेळी नमूद केले.
अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष रानबा मुळे, उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, शालेय समितीचे उपाध्यक्ष ऋषिकेश आंधळे, केंद्रप्रमुख जगन्नाथ चव्हाण, तलाठी श्री. गोटे, शिक्षण समिती सदस्य ज्ञानेश्वर मैड, गजानन साळवे, ज्ञानेश्वर कदम, युनूस खा पठाण, अंगद सोगे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. गावडे म्हणाले की, ‘जिल्हा परिषद शाळांमधून शिकून अनेक विद्यार्थी आज शासनाच्या विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बालपणापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करावे. शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचेही जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले. कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
इयत्ता पहिलीला प्रवेश झालेल्या मुलांचे जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाळेची 416 ही पटसंख्या पाहून जिल्हाधिकारी यांनी अशीच उत्तरोत्तर संख्या वाढवावी व शिक्षण आयुक्तांनी दिलेले अतिरिक्त 25% उपस्थिती पटाचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांसाठी तयार होणारा पोषण आहार स्वादिष्ट असल्याची पावती देत पोषण आहार कर्मचाऱ्यांचे पुष्प देऊन कौतुक केले. शाळेत होणारी नवोदय शिष्यवृत्ती या परीक्षेची तयारी व त्यातून शाळेत मिळणारे यश पात्र होणारे लाभार्थी याबद्दल समाधान व्यक्त करून धारकांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.
पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट इत्यादी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गावडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. ग्रामस्थ, पालक, ग्राम पंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, अंगणवाडी व्यवस्थापन, प्रशासन हे सर्व घटक एकत्र येणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गोविंद वंजे यांनी केले. सूत्रसंचालन सुनील काकडे यांनी तर आभार प्रदर्शन गोविंद देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवृंदांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी गावकरी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित हो