बालकामगार निर्मूलन जनजागृती मोहीम सुरू
सेलूत धाड समिती पथकाच्या भेटी
परभणी : कामगार विभागाच्या निर्देशानुसार, परभणी जिल्ह्यात बालकामगार निर्मूलनासाठी विशेष अभियान राबवले जात आहे.याचाच एक भाग म्हणून बालकामगारांविरोधी धाड समितीचे पथक सेलू शहरात दाखल झाले आहे. या अभियानांतर्गत बालकामगारांविरोधात जनजागृती करण्यात आली असून, स्थानिक व्यावसायिक, दुकानदार आणि नागरिकांना बालकामगार न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
या विशेष मोहिमेबाबत कामगार विभागाचे निरीक्षक अ. मु. सौदागर (दुकाने निरीक्षक, परभणी) यांनी स्पष्टपणे सांगितले, की “बालक हा कामासाठी नव्हे, शिक्षणासाठी आहे. बालकामगार ठेवणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. बालकांना शिक्षणाकडे प्रवृत्त करा. त्यांना शैक्षणिक साहित्य लागल्यास कामगार विभाग व संबंधित स्वयंसेवी संस्थेच्या वतीने मदत केली जाईल.”
बालकामगार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ चाइल्डलाइन क्रमांक 1098 वर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती गोपनीय ठेवली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. या धाडसत्रात परभणी येथून आलेल्या अधिकाऱ्यांनी भाग घेतला. समितीत अधिकारी यु.एस. पतंगे, अनंता सोगे, लक्ष्मण गायकवाड एस.एम. घुगे, नागनाथ कर्वे यांचा समावेश होता. कार्यवाही सुरू करण्यापूर्वी या सर्व अधिकाऱ्यांनी सेलू पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांची भेट घेऊन मोहिमेची माहिती दिली. पोलिसांनीही या उपक्रमाला पूर्ण सहकार्य दर्शवले आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश खालीलप्रमाणे आहे:
* बालकामगारांचा वापर थांबवणे.
* गरीब आणि वंचित कुटुंबांतील मुलांना शिक्षणाकडे वळवणे.
* पालकांमध्ये बालकामगारांच्या दुष्परिणामांबाबत जागृती निर्माण करणे.
* बालकामगार प्रतिबंधक कायद्यातील कायदेशीर कार्यवाहीबाबत माहिती देणे.
हे अभियान केवळ धाडसत्रापुरते मर्यादित न ठेवता, सतत जनजागृती करून समाजात सकारात्मक बदल घडवणे हा यामागील व्यापक उद्देश आहे. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले असून, बालकांच्या भविष्यासाठी शासनाची ही पाऊले निश्चितच प्रेरणादायी ठरली आहेत.