शाळांतील ६० अनाथ बालकांचे एचएआरसीने स्वीकारले पालकत्व
वाचनामुळे मानवी जीवनात क्रांती घडते – प्रा.अनंत मोगल
सेलू : पुस्तक वाचल्यामुळे माणसाच्या विचारांत परिवर्तन घडून येते आणि विचारानुसार केलेली कृती त्याला यश मिळवून देते. ज्यांना मुक्या शब्दांना वाचा फोडता येते, तो क्रांती घडवून आणू शकतो, हे पुस्तकाच्या वाचनातून कळते, असे प्रतिपादन प्रा. अनंत मोगल यांनी केले. एच.ए.आर.सी. संस्थेच्या वतीने शनिवार, दिनांक २१ रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, सेलू येथे आयोजित शालेय कीट वाटप व उत्कृष्ट बालवाचक कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, महान कार्य करणाऱ्या व्यक्तींची आत्मचरित्र वाचायला हवीत, कारण त्यातून आपल्याला जीवनात काय पाळावे आणि काय टाळावे हे त्यांच्या अनुभवांवरून समजते.
शाळा सुरू झाल्यावर शैक्षणिक साहित्य खरेदीची लगबग सुरू होते; परंतु समाजातील वडिलांचे छत्र हरवलेल्या एकल पालक आणि अनाथ बालकांना शैक्षणिक साहित्य मिळत नाही. अशा वंचित बालकांना त्यांच्या शिक्षणातील अडथळा दूर व्हावा आणि त्यांचे शिकणे सुकर व्हावे यासाठी शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मधुकर काष्टे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून एचएआरसीचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, रामराव गायकवाड, डॉ. शरद ठाकर, माधव गव्हाणे, कल्पना हेलसकर हे उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या ६० एकल पालक विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी ‘उन्हाळ्याची सुट्टी पुस्तकांशी गट्टी’ या वाचन उपक्रमातील जिल्हा परिषद शाळा रायपूर येथील उत्कृष्ट बालवाचक विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह व ग्रंथभेट देऊन कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पवन चांडक यांनी केले, तर सूत्रसंचालन पांडुरंग पाटणकर यांनी केले. आभार प्रदर्शन पद्माकर गोंडगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रेयश मंत्री आणि राजेंद्र खापरे यांनी परिश्रम घेतले.
शैक्षणिक किटमध्ये काय आहे?
शैक्षणिक किटमध्ये स्कूल बॅग, एक डझन वह्या, एक डझन रजिस्टर, कंपास पेटी, उजळणी पुस्तक, चित्रकला वही व चित्रकला साहित्य, तसेच नववी आणि दहावीच्या वर्गांकरिता पाठ्यपुस्तके असे एकूण १२०० रुपयांचे साहित्य आहे.
एचएआरसी संस्थेची भूमिका
एचएआरसी संस्था २०१० पासून शैक्षणिक किट वाटप हा उपक्रम राबवत आहे. यावर्षी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील जिंतूर, पूर्णा, परभणी, सेलू, गंगाखेड, पाथरी, वसमत आणि औंढा तालुक्यातील एकूण ३०० एकल पालक व अनाथ लाभार्थ्यांना शैक्षणिक आणि सामाजिक दायित्व म्हणून शैक्षणिक किटचे वाटप करणार असल्याचे एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक यांनी सांगितले.