परभणीत ‘सामाजिक न्याय दिन’ उत्साहात

परभणीत ‘सामाजिक न्याय दिन’ उत्साहात

शाहू महाराजांनी राजेपदाचा उपयोग समतेसाठी केला : मनपा आयुक्त धर्येशील जाधव

परभणी : राजर्षी शाहू महाराज केवळ एक राजा नव्हते, तर ते सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. त्यांनी समाजातील शोषित, वंचित आणि उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या राजेपदाचीही पर्वा न करता कार्य केले, असे प्रतिपादन परभणी महानगरपालिकेचे आयुक्त धर्येशील जाधव यांनी केले. समतेच्या मूल्यांसाठी त्यांनी जातीय बंधनांवर प्रहार केला, असेही ते म्हणाले.

सामाजिक न्याय विभाग आणि सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, परभणी यांच्या वतीने गुरुवारी (२४ जून रोजी) श्री शिवाजी महाविद्यालय सभागृहात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी मनपा आयुक्त धर्येशील जाधव बोलत होते.

यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र विभागाचे संचालक प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी प्रमुख व्याख्याते म्हणून मार्गदर्शन केले. तहसीलदार डॉ. संदीप राजापुरे, उपप्राचार्य श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य नारायण राऊत, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद लोणकर, समाजकल्याण अधिकारी एस. के. भोजणे आणि कार्यक्रम संयोजक सहाय्यक आयुक्त राजू एडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात संविधान उद्देशिकेची फ्रेम देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. वसंत अनुसूचित जाती आश्रमशाळा, कारेगाव येथील शाहू महाराजांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. मुंजाजी कांबळे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. तसेच, निवासी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. गोणारकर यांनी शाहू महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “शाहू महाराजांचे मन कष्टकरी, भूमिहीन आणि उपेक्षित जनतेच्या वेदनेने हेलावलेले होते. त्यांच्या अंतःकरणात प्रचंड वात्सल्य आणि सामाजिक समतेची तीव्र तळमळ होती. त्यांनी शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे आणि मोफत केले. मराठा, मुस्लिम, जैन, दलित, लिंगायत अशा सर्व जातीधर्मातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे स्थापन केली. शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी समाजपरिवर्तनाचे कार्य केले.”

यावेळी तहसीलदार डॉ. राजापुरे, डॉ. लोणकर आणि प्रा. नागनाथ राऊत यांनीही मार्गदर्शनपर विचार मांडले. प्रास्ताविक करताना सहाय्यक आयुक्त राजू एडके यांनी सांगितले की, शाहू महाराजांचे कार्य आजही प्रशासन आणि समाजातील विषमतेची दरी कमी करण्यासाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्यांचे विचार अंगीकृत करणे हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवणअप्पा साळेगावकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली आणि व्यसनपदार्थांची प्रतिकात्मक होळी करून एक चांगला संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!