चिकलठाणा खुर्द येथील रस्त्यावर गटारपाणी
नागरिक उपोषणाच्या तयारीत
सेलू : सेलू तालुक्यातील चिकलठाणा खुर्द येथील रासवे गल्ली परिसरातील रहिवाशांनी गटारपाण्याचा प्रश्न आणि रस्त्यांची दुरवस्था याबाबत पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. गावातील मुख्य रस्त्यावर गटारपाणी येत असल्याने, रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, शाळकरी मुलांना आणि वयोवृद्धांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मागील २० वर्षांपासून गटारपाण्याचा हा प्रश्न प्रलंबित आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी हा केवळ एक राजकीय मुद्दा बनतो आणि आश्वासने देऊन नेते आपापला स्वार्थ साधतात, परंतु प्रश्न मात्र आजही कायम आहे. भविष्यात यातून काही गंभीर स्वरूपाची घटना घडण्यापूर्वीच यावर मार्ग काढून रस्ता व नालीची दुरूस्ती करावी. तत्काळ उपाययोजना केली नाही, तर त्रस्त नागरिकांना पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करावे लागेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. ज्ञानेश्वर रासवे, दत्तात्रय रासवे, महेश थोंबाळ यांच्यासह अनेक नागरिकांच्या या निवेदनावर सह्या आहेत.