यश टिकवण्यासाठी संयमाची शिस्त हवी : डॉ.अशोक नाईकनवरे
सेलूतील नूतन विद्यालयातील ३० शिष्यवृत्तीधारकांचा गौरव

सेलू : विद्यार्थ्यांनी चिकाटी आणि सातत्य ठेवल्यास स्पर्धा परीक्षांमध्ये निश्चित यश मिळते. परंतु मिळालेल्या यशाने हुरळून न जाता, ते टिकवण्यासाठी संयमाची शिस्त आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी विद्यार्थी तथा प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.अशोक नाईकनवरे यांनी केले.
नूतन विद्यालयाच्या एमटीएस आणि पाचवी व आठवीतील ३० शिष्यवृत्तीधारकांचा गौरव शनिवारी, १२ जुलै रोजी डॉ.नाईकनवरे यांच्या हस्ते झाला.
अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर होते. यावेळी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, राजेश गुप्ता, किरण देशपांडे, रोहिदास मोगल, शंकर बोधनापोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. आर्या कुलकर्णी, मैथिली मोरे, अर्णव क्षीरसागर, आरीज खान पठाण आणि शाश्वत संघई यांनी मनोगत व्यक्त केले. देशपांडे यांनी प्रास्ताविक केले, तर अशोक लिंबेकर यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. सुनील तोडकर यांनी यादी वाचन केले. सूत्रसंचालन बाळू बुधवंत यांनी केले. सुधीर जोशी यांनी आभार मानले.
… आणि प्रमुख पाहुणे गहिवरले शालेय जीवनात शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाच्या आठवणी सांगताना शाळेचे माजी विद्यार्थी तथा प्रमुख पाहुणे डॉ.अशोक नाईकनवरे यांना गहिवरून आले. सातवी शिष्यवृत्तीसाठी सकाळी सात ते नऊ या वेळेत जादा वर्ग आणि दहावीसाठीही केवळ अकरा विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत स्वयंअध्ययन प्रकल्पाद्वारे परिश्रमपूर्वक पुढाकार घेणारे शिक्षक अशोक लिंबेकर, बाबासाहेब हेलसकर आणि बन्सीधर पद्मावत यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख त्यांनी केला. सर्वच शिक्षकांनी दाखविलेल्या आपुलकीचा संदर्भ देताना ते भारावून गेले.