हिंदू धर्म जागरण यात्रेचे उत्साहात स्वागत
सेलूत ‘जय श्रीराम’ जयघोष
सेलू : औंढा नागनाथ येथून काढण्यात आलेल्या ‘सनातन हिंदू धर्म जागरण यात्रा’ आणि ‘कलश यात्रेचे रविवारी, १३ जुलै रोजी सेलू शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. ‘श्रीराम जयराम जय जय राम’ जयघोषाने सेलू शहर दुमदुमून गेले. गौमातेला राष्ट्रमाता घोषित करणे, गोहत्येवर पूर्ण बंदी घालणे आणि भारताला संवैधानिकदृष्ट्या हिंदू राष्ट्र घोषित करणे, भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी (मथुरा) मुघलकालीन अतिक्रमणातून मुक्त करून भव्य मंदिराचे निर्माण करणे, काशी विश्वनाथ-ज्ञानवापी परिसर पूर्णपणे हिंदू धर्मियांना सोपवणे आणि सनातन हिंदू धर्म राष्ट्रीय बोर्डाची स्थापना करणे हा यात्रेचा मुख्य उद्देश आहे. मुख्य संयोजक आंतरराष्ट्रीय कथावाचक युवाचार्य श्री विवेकदासजी शास्त्री महाराज (काशी वाराणसी, श्रीधाम वृंदावन) आहेत, असे आयोजक पुरुषोत्तम मापारी आणि वर्षा मापारी यांनी सांगितले. यात्रेत भगवा ध्वज यात्रा, मातृशक्ती कलश यात्रा आणि भजन, कीर्तन, होत आहे. परळी वैजनाथ, पाथरी, सेलू, मंठा, लोणार, हिवरा आश्रम, चिखली, राजूर या मार्गाने १८ जुलै रोजी चिंचपूर मोताळा (जि.बुलढाणा) येथील रायरेश्वर महादेव मंदिरात या यात्रेचा समारोप, तर २२ जुलै रोजी जलाभिषेक आणि महाप्रसादाने सांगता आहे. रथ आणि बारा वाहनांचा समावेश असलेल्या या भव्य यात्रेत तीनशेहून अधिक महिला, पुरूष, भाविक सहभागी झालेले आहेत.