‘निम्न दुधना’ कालव्याद्वारे तातडीने पाणी सोडावे
सेलू तालुका दबाव गटाची मागणी
सेलू : परभणी जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप पिके धोक्यात असल्याने सेलू तालुक्यातील निम्न दुधना धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडण्याची मागणी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना १५ जुलैरोजी निवेदन सादर करण्यात आले आहे. जवळपास दीड महिना उलटूनही परभणी जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकरी चिंतेत असून त्यांची कापूस, सोयाबीन, तूर, मूग यांसारखी खरीप पिके पाण्याअभावी सुकत आहेत. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांना निम्न दुधना धरणातून तातडीने पाणी सोडण्याची आवश्यकता आहे, असे निवेदनात नमूद आहे. निवेदनावर ॲड.श्रीकांत वाईकर, गुलाब पोळ, इसाक पटेल, ओमप्रकाश चव्हाळ आदींसह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.