शेतपिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत
विभागीय आयुक्त पापळकर यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
परभणी : परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे व नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून बाधित शेतकरी व नागरिकांना एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी) आणि एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद निधी) मधील तरतुदींनुसार आर्थिक मदत देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना दिले आहेत. दरम्यान, या अनुषंगाने जिल्हाप्रशासनाने तालुकास्तराव विशेष पथके गठीत करून कार्यवाही सुरू केली आहे.
१५ मंडळात अतिवृष्टीने मोठे नुकसान
१७ जुलैरोजी परभणी तालुक्यातील पेडगाव व जांब, पाथरी तालुक्यातील पाथरी, हादगाव व कासापुरी, जिंतूर तालुक्यातील जिंतूर, वाधी धानोरा, सेलू तालुक्यातील सेलू, देऊळगाव, चिकलठाणा, मोरेगाव, आणि मानवत तालुक्यातील मानवत महसूल मंडळात अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर २२ जुलैरोजी पाथरी तालुक्यातील बाभळगाव, हादगाव, कासापुरी, जिंतूर तालुक्यातील बोरी, वाधी धानोरा, सेलू तालुक्यातील चिकलठाणा, मोरेगाव, सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ आणि मानवत तालुक्यातील केकरजवळा या महसूल मंडळांमध्येही अतिवृष्टी झाली.
पथके गठीत, बाधितांना लवकरच मदत मिळणार
विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार, जिल्हा प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी २४ जुलै रोजी परभणी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसीलदार यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या आणि घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी वस्तूंच्या नुकसानीचे पंचनामे करून, बाधित शेतकरी व नागरिकांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफमधील तरतुदींनुसार लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने, तालुकास्तरावरुन विशेष पथके गठीत करण्यात आली असून, नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. निकषानुसार आर्थिक मदत देण्याची प्रक्रियाही लवकरच पूर्ण केली जाईल, असे प्रशासनाने कळवले आहे.