Authored By Babasaheb Helaskar
परभणी : यंदा उन्हाच्या तीव्रतेने सेलू (जि.परभणी) तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्न दुधना सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणावर घट झाली. १५.८५ दलघमी (१५ अब्ज ८५ कोटी लिटर) पाणी बाष्पीभवनामुळे उडाल्याचे समोर आले आहे, तर सिंचन, पिण्याचे पाणी, बाष्पीभवन अन्य माध्यमातून ११ डिसेंबर ते १४ जून या सहा महिन्यांच्या काळात जिवंत पाणी साठा ४२.९४ टक्क्यांनी घसरला आहे.
गेल्या पावसाळ्यात पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे जुलै-ऑगस्टमध्ये धरण शंभर टक्के भरले. क्षमतेपेक्षा अधिक पाण्याची आवक लक्षात घेऊन, वेळोवळी विसर्ग करण्यात आला. १२ टीएमसी क्षमतेच्या निम्नदुधना धरणातून सांडव्याद्वारे २९.५७४ टीएमसी (८६७.४५६ दशलक्ष घनमीटर), जवळपास अडीच पट पाणी नदीपात्रात सोडावे लागले. अखेरच्या टप्प्यात महिनाभरानंतर, तीन नोव्हेंबरला विसर्ग थांबविण्याचा नवा विक्रमही स्थापित झाला आहे.
२० हजार हेक्टरला सिंचनाचा लाभ
मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने पाटबंधारे विभागाकडून मागणी प्रमाणे रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांसाठी सहा पाणी पाळ्या देण्याचे नियोजन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. लाभक्षेत्रातील रब्बी पिकांसाठी डाव्या व उजव्या कालव्याद्वारे पहिली पाणी पाळी १२ ते २५ डिसेंबर २०२१, दुसरी ९ ते २२ जानेवारी २०२२, तिसरी ६ ते १९ फेब्रुवारी २०२२ घेण्यात आली. उन्हाळी पिकांसाठी पहिली पाळी ६ ते १९ मार्च, दुसरी ३ ते १६ एप्रिल तर तिसरी पाळी १ ते १४ मे २०२२ या कालावधीत घेण्यात आली. अपूर्ण कामांमुळे ४८ हजार हेक्टर पैकी सद्यस्थितीत लाभ क्षेत्रातील वीस हजार हेक्टरला सिंचनाचा लाभ मिळत आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला (११ डिसेंबर २०२१) धरणांमध्ये ९९.०७ टक्के जिवंत पाणी साठा होता. मंगळवारपर्यंत (१४ जून) तो ५७.१३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. सहा महिन्यांत ४२.९४ टक्के पाणी कमी झाले आहे. पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त बाष्पीभवनामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी उडाले. विशेषतः एप्रिल-मे महिन्यात पारा ४२ ते ४७ अंश दरम्यान राहिला. यामुळे बाष्पीभवनाची वारंवारता मोठी राहिली. यंदा पाणलोट क्षेत्रात अद्यापही पाऊस नाही.धरणात आवकही नाही. यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
१५ ऑक्टोबर ते चार जूनपर्यंत रब्बी हंगामासाठी डावा (७.२ दलघमी), उजवा कालवा (४.३ दलघमी) असे एकूण ११.५ दलघमी, तर उन्हाळी हंगामासाठी डाव्या कालव्यातून ६ दलघमी, उजवा कालवा ५.३ दलघमी, असे एकूण ११.३ दलघमी पाणी सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यात आले, तर पिण्याचे पाणी, बाष्पीभवन, बिगर सिंचन व इतर व्ययात ८४ दलघमी पाणी धरणातून गेल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेषतः सेलू, परतूर व मंठा शहरासह काही ग्रामीण पाणी योजनांना पिण्याच्या पाण्यासाठी धरणाचा मोठा आधार मिळत आहे.