शिवशंकर निरगुडे, हिंगोली
हिंगोली : श्रीक्षेत्र पंढरीच्या दिशेने निघालेल्या शेगावच्या संतश्री गजानन महाराजांच्या पालखीचे गुरुवारी (१६ जून) मराठवाड्यात आगमन झाले आहे. पानकनेरगाव ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखी घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होती. सेनगावनगरीमध्ये आज पालखीचा मुक्काम आहे.
पानकनेरगाव येथील हनुमान मंदिर परिसरात सकाळी वारकर्यांना नाष्टा देण्यात आला. जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
श्रीसंत गजानन महाराजांची पालखीचे सहा जून रोजी शेगाव येथून प्रस्थान झाले आहे. पायी वारीत भजनी मंडळी, दिंडी अश्वांसह सातशे आठशे वारकरी विठू नामाचा जयघोष करीत पंढरपूरकडे निघाले आहेत. आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून पालखीचे प्रस्थान झाले आहे. श्री गजानन महाराजांची पालखीमध्ये कोरोना नंतर दोन वर्षांनी भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे.
सोळा जूनरोजी विदर्भातून श्रीच्या पालखीचे आगमन मराठवाड्यात झाले आहे. पावसानेदेखील जोरदार हजेरी लावली. सरीवर सरी झेलत मराठवाड्याच्या सीमेवर पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी आमदार तानाजी मुटकुळे, पोलिस निरीक्षक रणजित भोईटे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.