परभणी : सेलू शहरातील जिंतूर रोड, विद्यानगर, डॉ.झाकेरहुसेन नगर, हेमंतनगर, शिवाजीनगर, शाहूनगर, स्मशानभूमीकडे जाणार्या मुख्य व सर्वात मोठया नाल्याची साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरवर्षी पावसाळयात हा नाला तुडूंब भरुन वाहत असतो. अद्यापही या मुख्य नाल्याची साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात मोठा मुसळधार पाऊस झाल्यास, नाला भरुन नाल्यातील घाणपाणी जिंतूर रोड, विद्यानगर, डॉ. झाकेर हुसेननगर, हेमंतनगर, शिवाजीनगर-शाहूनगर येथील रहिवाशांच्या घरात घुसून, मोठ्या प्रमाणावर रोगराई व नुकसानीची शक्यता आहे. येत्या आठवडाभरात या नाल्याची सफाई करावी. शिवसेनेचे योगेश कथले यांनी शुक्रवारी मल्लिकार्जुन स्वामी यांना हे निवेदन दिले आहे. याआधीही तोंडी, लेखी निवेदने देऊन झाली आहेत. पावसाळ्यापूर्वी पासून हीच मागणी जागरूक नागरिक करीत आहेत. शहरातील या एकमेव मोठ्ठ्या नाल्याच्या साफसफाईची मागणी ऐन पावसाळ्यातही सुरुच आहे. संभाव्य धोके लक्षात घेऊन, महसूल व पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.