परभणी : शनिवारपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून बुधवारी (१३ जुलै) पहाटेपासून सर्वदूर पाऊस सुरूच आहे. संततधारेमुळे नदी, नाले भरून वाहत आहेत. काही भागात पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, सायंकाळी पाच वाजता सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्न दुधना प्रकल्पाचे दोन दरवाजे ०.३५ मीटरने उचलून, २३५७ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे, तर गोदावरी नदीवरील तारुगव्हाण बंधार्याचा एक, तर ढालेगाव व मुद्गल बंधार्याच्या दोन दरवाज्यातून विसर्ग करण्यात आला आहे. दुधना, गोदावरी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सेलू ( जि.परभणी) तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील जालना जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढत आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता जलाशय पाणीपातळी ४२५.०२० मीटर, तर जिवंत पाणी साठा १७३.०७३ दलघमी (७१.४६) झाला होता. जलाशय प्रचलन आराखड्यानुसार सायंकाळी पाच वाजता विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, दुधना नदीपात्रातील पाणीपातळी वाढून पूरस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीकाठच्या गावांना सतर्क राहावे; तसेच नदीपात्रात कुणीही जाऊ नये, असा सावधानतेचा इशारा निम्न दुधना प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष, महसूल प्रशासनाने दिला आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे कळविले आहे.
गोदावरी नदीवरील तारुगव्हाण उच्चपातळी बंधार्यातून सकाळी नऊ वाजल्यापासून एक दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला. तर ढालेगाव, मुदगल बंधार्याची दोन दरवाजे उघडून ८६१५ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पूर्णा तालुक्यातील डिग्रस बंधार्यातसुध्दा पाण्याची आवक ओळखून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.
चार गावांचा संपर्क तुटला
बुधवारी सकाळपर्यंत चोवीस तासांत जिल्ह्यात ५७.८ मिलीमिटर पावसाची नोंंद झाली आहे. त्यात गंगाखेड, पूर्णा, पालम या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी, वडगाव, फुकटगाव, सोनखेड या चार गावांचा संपर्क तुटला आहे. माटेगाव पूल पाण्याखाली गेल्याने झिरोफाटामार्गे नांदेडकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली आहे. परभणी ५६.२ गंगाखेड ६५.५, पाथरी ४२.५ , जिंतूर ४८.५, पूर्णा ९५.१, पालम ८०.५, सेलू ४३.१, सोनपेठ ४३.२, तर मानवत तालुक्यात ४०.८ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.