परभणी : करोना काळात रद्द केलेला अजंता एक्सप्रेससह सहा रेल्वेगाड्यांचा सेलू स्थानकावरील थांबा पूर्ववत करावा, अशी मागणी प्रवासीसंघाच्यावतीने करण्यात आली आहे.
दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन यांची प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सिकंदराबाद येथे सोमवारी (१८ जुलै) भेट घेऊन निवेदन दिले. चर्चा केली. या वेळी विजय मंत्री, रमेश काला, हरिकिशन शर्मा, व्यंकटेश काबरा, श्रीकांत वाईकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. सेलू स्थानकावरून औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड या मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सेलूसह जिंतूर, मंठा, पाथरी व अन्य शेजारच्या तालुक्यातील प्रवाशांचा ओढा सेलू स्थानकाकडे अधिक आहे. या माध्यमातून वार्षिक पाच कोटी रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळते.
गेल्या ५५ वर्षांपासून अजंता एक्स्प्रेसला ( गाडी क्रमांक १७०६३ , १७०६४ सिकंदराबाद – मनमाड – सिकंदराबाद) सेलू स्थानकावर थांबा आहे. मात्र करोना काळात या गाडीसह अन्य चार गाड्यांचा रद्द केलेला थांबा अद्याप पूर्ववत झालेला नाही. यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. गाडी क्रमांक १७२०६ काकीनाडा – साईनगर शिर्डी एक्सप्रेस, गाडी क्रमांक १७२०८- विजयवाडा – साईनगर शिर्डी एक्सप्रेस, गाडी क्रमांक १७००२ – सिकंद्राबाद – साईनगर शिर्डी एक्सप्रेस, गाडी क्रमांक १७४१८ – साईनगर शिर्डी – तिरुपती एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांचा थांबाही तातडीने पूर्ववत करावा; तसेच प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन नगरसोल – नरसापूर – नगरसोल, हैदराबाद – जयपूर – हैदराबाद या एक्स्प्रेसला सेलू स्थानकावर थांबा मंजूर करावा. पिण्याचे पाणी, स्वच्छता व अन्य मूलभूत सोयीसुविधा स्थानकावर पुरेशा प्रमाणात पुरविण्यात याव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.
उत्पन्न देणारे थांबे रद्द केल्याने आश्चर्य !
दक्षिण मध्य रेल्वेच्या काचिगुडा- मनमाड मार्गावर मीटरगेज असतांना १ एप्रिल १९६७ रोजी अजंता मेल एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. मराठवाड्यातील प्रवाशांना मनमाडहून पुढे जाण्यासाठी ही गाडी सोयीची ठरली. भारतात सर्वाधिक सरासरी ताशी ४२.५ किलोमीटर वेगाने धावणारी मीटरगेज रेल्वे गाडी म्हणून अजंता एक्स्प्रेसला ओळख मिळाली होती. प्रवाशांच्या मोठ्या प्रतिसादाने अल्पावधीतच अजंता नावारुपाला आली. पुढे १९९२-९५ दरम्यान मनमाड – परभणी मार्ग ब्रॉडगेजमध्ये रुपांतरीत झाल्यानंतर काही काळ बिदरमार्गे ही धावत होती. पुढे ती जुन्याच मार्गाने सुरू झाली. परंतु करोना काळापासून रद्द करण्यात आलेले या गाडीचे परभणी जिल्ह्यातील सेलू, मानवत, व जालना जिल्ह्यातील परतूर हे जुने आणि उत्पन्न देणारे थांबे अद्यापही पूर्ववत सुरू केले गेले नाहीत. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.