आरक्षणाचा आनंदच; पण लढाई संपलेली नाही : गोविंद यादव

गंगाखेड : सर्वोच्च न्यायालयाने आज स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण कायम केले. ही बाब निश्चितच आनंददायी आहे. परंतू, आज स्वीकारण्यात आलेल्या बांठीया आयोगाने ओबीसींची संख्या कमी दर्शवलीय, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.ओबीसी बांधवांचा पुढचा लढा जातनिहाय जनगणनेसाठी असला पाहिजे. यासाठी ओबीसी बांधवांनी सज्ज राहावे, असे मत गंगाखेड कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा ओबीसी नेते गोविंद यादव यांनी बुधवारी (२० जुलै) व्यक्त केले.
ओबीसी आरक्षण निकालावर प्रतिक्रिया देताना यादव बोलत होते. महाविकास आघाडी सरकारने आयोग नेमला. आयोगाकडून आवश्यक तो डाटाही जमा केला गेला; परंतु हा डाटा संकलित करत असताना आडनावावरून जाती ठरवण्यात आल्या. परिणामी ओबीसींची जनसंख्या अतिशय कमी होवून, केवळ ३६ टक्के दाखवली गेली. वस्तुतः मागील काळात ५२ ते ५४ टक्के असलेली ओबीसींची संख्या आता साठ टक्क्यांपर्यंत पोहोचलेली असणार आहे. ही संख्या नेमकी किती, हे समजण्यासाठी वस्तुनिष्ठ जातनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे. ती करण्यासाठी आंदोलन उभारण्याची आवश्यकता आहे. हे आंदोलन करण्यासाठी ओबीसी बांधवांनी सज्ज रहावे, असे आवाहन गोविंद यादव यांनी केले आहे.
दरम्यान, आज गंगाखेड शहरात ओबीसी एल्गार परिषदेच्या वतीने न्यायालयाच्या निकालाचे जोरदार स्वागत करण्यात आले. तहसील कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करून, पेढे वाटून आंनदोत्सव करण्यात आला. या वेळी गोविंद लटपटे, सुरेश बंडगर, गोविंद यादव, बालाजी मुंडे, सखाराम बोबडे, मगर पोले, तुकाराम तांदळे, प्रा.मुंजाजी चोरघडे, राम फड उखळीकर, माधव शेंडगे, साधना फड, ॲड. आदिनाथ मुंडे, प्रल्हाद मुंडे, मनोज मुरकुटे, संदिप लटपटे, संतोष मुंडे, बळी होळंबे आदींसह एल्गार परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!