परभणी : संस्कारकथा व्यक्तीचं आयुष्य घडवितात,असे प्रतिपादन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे चिटणीस डॉ.विनायकराव कोठेकर यांनी सेलू (जि.परभणी) येथे केले.
सानेगुरुजी कथामालेच्या (कै) सौ.दुर्गाताई कुलकर्णी यांचा पाचवा स्मृतिदिन आणि श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त, शुक्रवारी आयोजित आंतरशालेय कथाकथन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.कोठेकर बोलत होते. मुख्याध्यापिका संगीता खराबे, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, परीक्षक मधुकर काष्टे, कल्पना हेलसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.कोठेकर म्हणाले, ” सौ.दुर्गाताई यांनी सेलू शहरात कथामालेचे रोपटे लावले. त्या रोपट्याद्वारे सेलूतच नव्हे; मराठवाड्यात अनेक संस्कारक्षम पिढ्या घडल्या आहेत.” ‘खरा तो एकचि धर्म’ प्रार्थनेने स्पर्धेची सुरुवात झाली. प्रास्ताविक खराबे यांनी केले. स्पर्धेत सेलू शहरातील एकवीस शाळांतील स्पर्धकांनी सहभाग नोंदवत, श्रोत्यांची मने जिंकली. मधुकर काष्टे, डॉ.अनघा वैद्य यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्रीकांत नेवरेकर यांनी केले. स्पर्धेसाठी अनिल रत्नपारखी, भालचंद्र गांजापूरकर, शशिकांत देशपांडे, कीर्ती राऊत, वैशाली चव्हाण, सीमा सुक्ते, सुरेखा रामदासी, रेणुका अंबेकर, अनंता बोराडे, बालाजी देऊळगावकार आदींनी परिश्रम घेतले.