परभणी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊन स्वच्छेने चार लाख तिरंगा ध्वज उभारतील, असा विश्वास जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (२२ जुलै) दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत गोयल यांनी ही माहिती दिली. या वेळी कार्यान्वय समितीचे सदस्य सचिव डॉ.संदीप घोन्सीकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांची उपस्थिती होती.
गोयल म्हणाल्या, ‘हर घर तिरंगा’ अभियानात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे; तसेच आपल्या घरावर तिरंगा फडकवावा. शासकीय-निमशासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालय, ग्रामपंचायत, महानगर पालिका, नगर पंचायत, विविध संस्थाच्या कार्यालयावर राष्ट्रध्वज डौलाने फडकवावा यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी तीन लाख, तर शहरी भागासाठी एक लाख, असे एकूण चार लाख झेंडे फडकविण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे. विविध माध्यमातून या अभियानाला लागणार्या झेंड्याचा पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटना, सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था, शिवभोजन केंद्र यांच्या बैठकीचे आयोजन करुन त्यांना या राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकांना आपल्या घरावर झेंडा फडकविण्यासाठी राष्ट्रध्वज उपल्बध व्हावा याकरीता जिल्ह्यात विविध ठिकाणी विक्री केंद्र सुरु करुन अगदी माफक दरात राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. नागरिकांनी ध्वज संहितेनुसार राष्ट्रीय ध्वजाचा मान-सन्मान राखत राष्ट्रध्वज फडकवला जाईल, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी यावेळी केले. दरम्यान, परभणी शहरातील ७० हजार घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाईल असे नियोजन आहे, असे महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी सांगितले.
नागरिकांना आपल्या घरावर झेंडा फडकविण्यासाठी राष्ट्रध्वज उपल्बध व्हावा याकरीता जिल्ह्यात विविध ठिकाणी विक्री केंद्र सुरु करुन अगदी माफक दरात राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. नागरिकांनी ध्वज संहितेनुसार राष्ट्रीय ध्वजाचा मान-सन्मान राखत राष्ट्रध्वज फडकवला जाईल, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी यावेळी केले.