‘निम्नदुधना’चे सहा दरवाजे उघडले

Authored By Babasaheb Helaskar

परभणी : सेलू (जि.परभणी) तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्नदुधना सिंचन प्रकल्पातून शनिवारी (३० जुलै) टप्प्याटप्प्याने नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात आला. सकाळी साडेसात वाजल्यापासून दोन, दुपारी बारा वाजल्यापासून चार दरवाज्यातून ४१३७ क्युसेक विसर्ग सुरू होता. सायंकाळी सात वाजता आणखी दोन दरवाजे ०.३५ मीटरने उघडून तो ७०७१ क्युसेक इतका वाढविण्यात आला आहे.

पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. सायंकाळी सहा वाजता जिवंत पाणी साठा ७०.८५ टक्के होता. चार तासांत १.९२२ दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. शनिवारी सायंकाळी सात वाजल्यापासून वीस पैकी सहा दरवाज्यातून विसर्ग सुरू झाला. आवक लक्षात घेऊन विसर्ग कमी अधिक करण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन निम्नदुधना प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष व प्रशासनाने केले आहे. दरम्यान, संपादित न केलेल्या प्रकल्पालगतच्या शेतजमीनीवरील पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी बारा टीएमसीच्या या प्रकल्पाला यंदाच्या पावसाळ्यात पाणी साठवण मर्यादा ७५ टक्के घालण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याची आवक लक्षात घेऊन नदीपात्रात वारंवार विसर्गाची चिन्हे आहेत.

पाणलोट क्षेत्रातील जालना जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने प्रकल्पात पाण्याची आवक सुरूच आहे. सकाळी साडेसात वाजता जलाशय पाणीपातळी ४२४.९९० मीटर, तर  जीवंत साठा १७१.६०३ दशलक्ष घनमीटर (७०.८५ टक्के) झाला होता. त्यामुळे सकाळी साडेसात वाजता दोन दरवाज्यातून २४५७ क्युसेक विसर्ग दुधना नदीपात्रात सुरू करण्यात आला. दुपारी बारा वाजता आणखी दोन दरवाजे उघडून विसर्ग वाढविण्यात आला. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे, असे आवाहन निम्न दुधना प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाने केले आहे.
दरम्यान, निम्न दुधना सिंचन प्रकल्प शंभर टक्के भरल्यावर प्रकल्पालगत असणाऱ्या; परंतु संपादित न केलेल्या शेतजमिनीत पाणी शिरून शेकडो एकरवरील पिके दरवर्षी पाण्याखाली जात होती. याचा मोठा आर्थिक फटका प्रकल्पालगतच्या शेतकऱ्यांना सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाच्या पाण्याने बाधित अतिरिक्त शेतजमीनीच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रकल्पातील पाणीसाठा ७५ टक्क्यांपेक्षा जास्त ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. गोदावरी खोरे विकास महामंडच्या नियामक मंडळाच्या आठ जून रोजीच्या बैठकीतच या संबंधी ठराव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. नियामक मंडळाच्या मान्यतेच्या अधीन राहून जालना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सु.भि.कोरके यांनी जून २०२२ च्या मान्सून हंगामात निम्न दुधनात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा न करण्याचे आदेश निर्गमित केलेले आहेत. यामुळे  नुकसान सोसाव्या लागणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, जोपर्यंत या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. तोपर्यंत यंदाच्या पावसाळ्यात आणि कदाचित पुढेही निम्न दुधना प्रकल्पातून वारंवार पाण्याचा वारंवार विसर्ग करावा लागेल, अशीच चिन्हे आहेत.

प्रकल्पाच्या पाण्याने बाधित अतिरिक्त शेतजमीनीच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत यंदाच्या पावसाळ्यात प्रकल्पातील पाणीसाठा ७५ टक्क्यांपेक्षा जास्त ठेवण्यास जालना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सु.भि.कोरके यांनी मनाई केलेली आहे. त्यामुळे ३४४ दलघमी साठवण क्षमता असणाऱ्या निम्नदुधना सिंचन प्रकल्पातून एक जूनपासून २८.५९३ दशलक्ष घनमीटर पाणी नदीपात्रात सोडावे लागले आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ७०.८५ टक्के जिवंत पाणीसाठा होता 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!