सेलू,१ (प्रतिनिधी) : सदृढ समाज निर्मितीसाठी सजग पत्रकारिता गरजेची आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाचे सहसचिव चंद्रशेखर मुळावेकर यांनी सोमवारी (एक ऑगस्ट) केले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ग्रंथपाल महादेव आगजाळ, पंडित जगाडे, विलास शिंदे, चंद्रकांत कल्याणे, शंभू काकडे, शिवाजी आकात, सुयोग साळवे, सूरज लाटे, रामचंद्र गजमल, विजय कांबळे पाटोदकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुळावेकर म्हणाले, ” समाजातील अनिष्ट प्रथा व सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्या घटनांना पायबंद घालण्यासाठी वृत्तपत्र हे माध्यम अतिशय प्रभावी माध्यम आहे. वृत्तपत्रे हे जनसामान्यांचा आवाज आहेत. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सामाजिक उपयोगितेविषयी केसरी वृत्तपत्रातून जनजागृती केली. आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत असताना त्याचा अतिरेक होता कामा नये. वृत्तपत्र वाचन हे केव्हाही चांगले, हे लक्षात घेतले पाहिजे. ”
दीनदुबळ्यांच्या दुःखद जगणं, कष्टाचे प्रतीक यासाठी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे वाचन सर्वांनी केले पाहिजे. कठीण जगणे काय असते, हे आण्णाभाऊ यांच्या बोलीभाषेत जशास तसे मांडलेले आहे. सुधारणावादी जगातही अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याकडे अजरामर साहित्य म्हणून पाहिले जाते. अण्णाभाऊंनी दीनदलितांच्या वेदना शाहीरीतून मांडल्या आहेत. ग्रंथालयात उपलब्ध अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यांचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. मोबाईलवर केलेले वाचन हे हृदयाला भिडत नाही, तर प्रत्यक्ष कादंबरी हातात घेतल्यानंतर डोळ्यातून आलेले अश्रू हे ते साहित्य किती विचारपूर्वक लिहिले हे सांगून जाते, असे ते म्हणाले.कार्यक्रमासाठी नागरिक, वाचक सभासद, कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक ग्रंथपाल महादेव आगजाळ, सूत्रसंचालन सहग्रंथपाल पंडित जगाडे, आभार विलास शिंदे यांनी मानले.
वाचनाची आवड अंगी जोपासणारी लहान मुलांसाठी असलेली ग्रंथालयातील मुलांचे मासिक, गोष्टी, विज्ञानकथांची छोटी पुस्तके वाचल्याने आनंद मिळतो, असे संकेश शिवाजी आकात याने या बालवाचकाने या वेळी सांगितले.