परभणी : सेलू (जि.परभणी) तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्नदुधना सिंचन प्रकल्पाच्या चार दरवाज्यातून सायंकाळी सात वाजल्यापासून ४७१४ क्युसेक ( प्रति सेकंद सुमारे १ लाख ३३ हजार ४५३ लिटर) दराने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. गुरुवारी (चार ऑगस्ट) दुपारी दोन दरवाजे ०.३५ मीटरने उचलून २३५७ क्युसेक दराने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. सायंकाळी सात वाजल्यापासून आणखी दोन दरवाजे उघडून विसर्ग वाढविण्यात आला. पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे निम्न दुधना प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. प्रकल्पाची जलाशय पाणीपातळी 424.990 मीटर झाली असून जीवंत पाणी साठा 171.603 दलघमी (70.85 टक्के) झाला आहे. त्यामुळे जलाशय प्रचलन आराखड्यानुसार पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नदीपात्रातील पाणीपातळी वाढून पूरस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीपात्रात कुणीही जाऊ नये, पाळीव प्राणी, गुरेढोरे, विद्युत मोटारी तसेच इतर तत्सम साहित्य इत्यादी तात्काळ काढून घेण्याबाबत; तसेच कुठलीही जीवित वा वित्तहानी होणार नाही. यासाठी नदीकाठच्या गावांना महसूल प्रशासन व निम्न दुधना पूर नियंत्रण कक्षाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे प्रशासनाने कळविले आहे.