परभणी : जिंतूर व सेलू (जि.परभणी) तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरु असलेल्या दहा रस्त्यांची २० कोटी पंचावन्न लाख रुपयांची कामे अत्यंत निकृष्ट पद्धतीने व बोगस होत आहेत, असा आरोप करीत, या बोगस कामांची सखोल चौकशी करा, अशी मागणी माजी आमदार विजय भांबळे यांनी जिल्हाधिकारी; बांधकाम विभागाकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
शुक्रवारी (पाच ऑगस्ट) भांबळे यांनी हे पत्र संबंधित विभागांना दिले आहे. सन २०२०-२०२१ मध्ये जिंतूर व सेलू तालुक्यामध्ये जोड रस्ता जांब (बुद्रुक) – ९५ लक्ष, जोडरस्ता सोरजा – १२० लक्ष, राज्य मार्ग २४८ ते शेक – १७० लक्ष, चामणी ते तेलवाडी रस्ता – १५५ लक्ष , येसेगाव ते कडसावंगी रस्ता- ६९५ लक्ष, प्रमुख जिल्हा मार्ग २ ते बेलोरा तांडा रस्ता १०० लक्ष, राज्य मार्ग २५३ ते काजळी रोहीणी – ४०० लक्ष, जोडरस्ता कुडा रोड २०० लक्ष, राज्य मार्ग २५३ ते पिंपराळा रस्ता – ६५ लक्ष, राज्य मार्ग २५३ ते वाकी – ५५ लक्ष ही कामे सुरु आहेत. या कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट पद्धतीने करण्यात येत आहे. या सर्व बोगस कामांची मुद्देनिहाय चौकशी करण्यात यावी. त्यात वरील कामांना संबधित खात्यांनी कार्यारंभ आदेश दिल्यानंतर ते काम विहित मुदतीत पूर्ण करणे गरजेचे असताना, बऱ्याच कामाची मुदत संपलेली आहे, म्हणून या सर्व कामांना नियमानुसार दंड लावून संबधित गुत्तेदारास काळ्यायादीत टाकण्यात यावे; व तसेच सर्व कामाच्या अंदाजपत्रकामध्ये मुरूम टाकण्याचे प्रस्तावित केलेले असतानाही, सर्व कामांवर बाजूच्या शेतातील काळी माती टाकण्यात आलेली आहे. हे रस्ते आताच पावसाने खराब झाले आहेत. कामांवर जीएसबी ४० मिमी, ६० मिमी असा कामाला गिट्टीला लागणारा दगड चांगला वापरणे आवश्यक असताना हा सर्व दगड मुरमाड दगड वापरण्यात आला आहे. त्यामुळे आताच हा रस्ता संपूर्ण खराब होत आहे. रस्त्यांवरील बरेचसे पुल प्रस्तावामध्ये समाविष्ट आहेत. या पुल बांधकामास चांगल्या दर्जाची रेती व उत्तम दर्जाचे क्रशसँड वापरणे गरजेचे असताना, त्या पुलावर बाजूच्या ओढ्यातील मातीयुक्त रेती व हलक्या दर्जाचे क्रशसँड वापरण्यात आले आहे. त्यामुळे पुढे भविष्यात हे पुल पडून मोठी हानी होऊ शकते. या सर्व पुलांच्या कामांना जे सिमेंट वापरले जात आहे ते सिमेंट ५३ ग्रेडचे न वापरता अत्यंत निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आले आहे. जांब ते कुडा या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मागील दीड महिन्यापूर्वी पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर सध्या संपूर्ण खड्डे पडलेले आहेत.
या सर्व कामांची इतर जिल्ह्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांची उच्चस्तरीय समिती गठीत करून, सखोल चौकशी करण्यात यावी; तसेच चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या सर्व कंत्राटदारांना काळ्यायादीत टाकण्यात यावे व शासनाच्या पैशाचा अपहार केल्याप्रकरणी संबंधितावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा; तसेच चौकशी पूर्ण होऊन अहवाल येईपर्यंत कुठलेही देयके देण्यात येऊ नयेत, अशी मागणी भांबळे यांनी पत्राद्वारे केली आहे.
रस्त्यांच्या मुख्य आधारासाठी वापरण्यात आलेली खडी (गिट्टी), पुलांसाठीचे सिमेंट निकृष्ट दर्जाचे आहे. साईडपट्टया मुरमाऐवजी काळी माती वापरून करण्यात येत आहेत. यामुळे काम पूर्ण होण्याआधीच रस्ते खराब होत आहेत. याची तात्काळ चौकशी करून कंत्राटदारासह सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत.
– विजय भांबळे, माजी आमदार, जिंतूर -सेलू
– विजय भांबळे, माजी आमदार, जिंतूर – सेलू