परभणी : सेलू (जि.परभणी) येथील सातोना रस्त्यावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सेलू नगरपालिका व मोरया प्रतिष्ठानच्या पुढाकाराने पाच हजार झाडांचे घनवन बहरणार आहे. याचा शुभारंभ जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (पाच ऑगस्ट) झाला. या वेळी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार दिनेश झांपले मुख्याधिकारी देविदास जाधव, मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित राजूरकर आदींची उपस्थिती होती. सेलू-सातोना राज्य महामार्गालगत नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्प परिसरातील दोन हजार चौरस मीटर मोकळ्या जागेत हे घनवन होत आहे. या ठिकाणी वीस प्रकारच्या स्वदेशी जातींच्या झाडांचे तंत्रशुद्ध पद्धतीने रोपण करण्यात येत आहे. वड, बांबू, पिंपळ, करंज, महारुख, आवळा, आपटा, पेरू, सागवान,पळस, चिंच, बोर आदी रोपांचा यात समावेश आहे. झाडांच्या संवर्धनासाठी नगरपालिकेकडून ठिबक सिंचनाची व्यवस्था केली जाणार आहे. कार्यक्रमाला पालिका कर्मचारी, मोरया प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.