Congress : कॉंग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेला गंगाखेडातून जल्लोषात सुरुवात
गंगाखेड : -कॉंग्रेस कमिटीच्या आझादी गौरव पदयात्रेचा गंगाखेड येथून प्रारंभ झाला. जिल्हाभरातून उपस्थित असलेले कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीने आज गंगाखेड शहर फुलून गेले होते. देशभक्तीपर गीते, घोषणाबाजी यांनी शहरातील वातावरण मंगळवारी, सहा ऑगस्टरोजी कॉंग्रेस आणि देशभक्तीमय झाले होते.
आझादी गौरव पदयात्रेचा शुभारंभ संत जनाबाई मंदीरातून झाला. जिल्हाध्यक्ष, आ.सुरेश वरपुडकर, माजी खासदार ॲड तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, परभणी शहर जिल्हाध्यक्ष नदीम ईनामदार, बाळासाहेब देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा जयश्रीताई खोबे, रामभाऊ घाडगे अप्पा, प्रा. शुभांगी शिसोदीया, भगवानराव वाघमारे, रवी सोनकांबळे, बाळकाका चौधरी, हरीभाऊ शेळके, गंगाप्रसाद काकडे, गंगाखेड तालुकाध्यक्ष गोविंद यादव, सेलू तालुकाध्यक्ष हेमंतराव आडळकर, सोनपेठ तालुकाध्यक्ष प्रा. मुंजाभाऊ धोंडगे, पुर्णा तालुकाध्यक्ष डॉ संजय लोलगे, पालम तालुकाध्यक्ष कृष्णा भोसले, गंगाखेड शहाराध्यक्ष शेख युनूस, युवक जिल्हाध्यक्ष अभय कुंडगीर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मिन्हाज कादरी, अ. जा. विभाग जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळवे आदींची उपस्थिती होती. येथे पाहुण्यांचे स्वागत बाबुराव गळाकाटू, सुशांत चौधरी, रोहिदास घोबाळे, सिद्धार्थ भालेराव, भाऊसाहेब मुंडे, अजीम भाई, हाजी गफार शेख, राम गायकवाड आदिंनी केले. ॲड संतोष मुंडे यांनी सूत्रसंचालन केले. कॉंग्रेसचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, वाढलेली महागाई, अग्नीपथ योजना रद्द करणे, अन्नधान्यावरील जीएसटी हटवणे, ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रूपये आर्थिक मदत देणे आदी मागण्या याप्रसंगी मांडण्यात आल्या.
पदयात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगणारा डिजीटल रथ आणि संगीत संचासह कार्यकर्यांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. संत जनाबाई मंदीर-छत्रपती शिवाजी महराज चौक- राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक-डॉ बाबासाहेब आंबडकर पुतळा – परळी नाका येथून खळी पाटीकडे रवाना झाली. खळी पाटी येथे ओंकार पवार परिवाराच्या वतीने पदयात्रेकरुंसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. येथून ही पदयात्रा दैठणा मुक्कामी रवाना झाली. गंगाखेड तालुक्यासह जिल्हाभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. महातपुरी फाटा ते खळी पाटीपर्यंत संततधार पाऊस सुरू असतानाही ही पदयात्रा सुरूच होती.