वक्तृत्वकला आत्मसात केल्याने व्यक्तीमत्व फुलते : डॉ.विनायकराव कोठेकर
सेलू : येथील उपविभागीय कार्यालय, नगरपरिषद, गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नूतन विद्यालयाच्या कै. रा.ब.गिल्डा सभागृहात बुधवार ( दि.१० ) रोजी आजादी का अमृत महोत्सवानिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा झाली. या वेळी प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर म्हणाले ” वक्तृत्व कला विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन, चिंतन करायला हवे. भाषणाची संहिता लिहून त्याचा रियाज करायला हवा. अभ्यास आणि सरावाने वक्तृत्व कला आत्मसात होते. वक्तृत्व कलेतून व्यक्तीमत्व विकास होतो.”
अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार प्रशांत थारकर, गजानन वाघमारे, केंद्र प्रमुख सरदार, मुख्याध्यापक नारायण सोळंके, उपमुख्याध्यापक संतोष पाटील यांची उपस्थिती होती. परीक्षक म्हणून रोहीणी कुलकर्णी, प्रा.हेमचंद्र हडसनकर, प्रा.अनंत मोगल यांनी काम पाहिले. वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळेतील पाचवी ते सातवी या प्राथमिक गटात बारा, आठवी ते दहावी या माध्यमिक गटात पंधरा, तर अकरावी ते बारावी या कनिष्ठ महाविद्यालयीन गटात दोन विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘महापुरुषांच्या स्वप्नातील भारत ‘ या विषयावर एकोणतीस बाल वक्त्यांनी अभ्यासपूर्वक आत्मविश्वासाने महापुरुषांच्या विचारांचा जागर घातला. नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी आपल्या भाषणात सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांनी केले. तालुका सहसंयोजक सुरेश हिवाळे यांनी सूत्रसंचालन तर संयोजक डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांनी आभार प्रदर्शन केले. वक्तृत्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गणेश माळवे, विरेश कडगे, फुलसिंग गावीत यांनी परिश्रम घेतले.