दर्जेदार लेखन विचारवंत, लेखक घडविते
सेलू : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त बुधवारी (१० ऑगस्ट) तालुकास्तरीय निबंध स्पर्धा झाली. बुधवारी, १० ऑगस्ट रोजी ज्ञानतीर्थ विद्यालयात पार पडली. या वेळी बोलताना नायब तहसीलदार प्रशांत थारकर म्हणाले, ” निबंध लेखन एक कला असून, दर्जेदार लेखनातून उद्याचे लेखक, विचारवंत घडत असतात.”
उपविभागीय अधिकारी कार्यालय, सेलू नगर परिषद व गटशिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे ही स्पर्धा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार प्रशांत थारकर, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, परीक्षक म्हणून गौतम सूर्यवंशी, काळे , संयोजिका शालिनी शेळके आदी उपस्थित होते.
५ वी ते ८ वी प्राथमिक व ९ वी ते १२ वी माध्यमिक या दोन गटात ही स्पर्धा घेण्यात झाली. एकूण ५३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. निबंध स्पर्धेतून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व आजचा विद्यार्थी उद्याच्या देशाचा आदर्श नागरिक घडेल. अशा संस्कारक्षम उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रूजविले जातील व नैतिक मूल्यांची जोपासना होईल. निबंध या शब्दाचा अर्थ समजून सांगताना ते म्हणाले की, नि म्हणजे नियमात राहुन आणि बंध म्हणजे बंधनात राहून लिहीलेली माहिती म्हणजे निबंध. परीक्षक गौतम सूर्यवंशी म्हणाले, ” महापुरुषांच्या स्वप्नातील भारत हा विषय इतका व्यापक आहे, की या विषयाशी निगडित लिहिण्यासारखी भरपूर अशी माहिती उपलब्ध आहे. परंतु ती माहिती व्यवस्थितरित्या आपल्या निबंधात मांडता येणे अपेक्षित आहे.”
निबंध स्पर्धेच्या माध्यमातून योग्य विचारांना योग्य चालना मिळते. आपले मत स्पष्टपणे व परखडपणे लिखित स्वरुपात मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे निबंध स्पर्धा होय. या स्पर्धेत शाळेतील चिमुकल्या बाल विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व आपल्या लिखाणात त्यांनी महापुरुषांच्या स्वप्नातील भारत कशा पद्धतीने असेल, याबाबतचे मत सादर केले, असे गजानन वाघमारे यांनी नमूद केले. सूत्रसंचालन डिगांबर टाके, तर आभार शालिनी शेळके यांनी मानले.
हेही वाचा : क्रांतिकारकांचे स्मरण नित्य करा : जयप्रकाश बिहाणी