निर्धारसभा : लोकशाही रक्षणासाठी कटिबद्ध व्हा
सेलू : हुकूमशाही प्रवृत्ती सत्तेवर विराजमान झाल्यामुळे आपली लोकशाही धोक्यात आली आहे. या देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी सर्व जाती-धर्माच्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. आपल्या लोकशाहीचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीय नागरीकांची जबाबदारी आहे. त्यासाठी कटिबद्ध व्हा, असे आवाहन साईबाबा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आठवडी बाजार परिसरात सर्वपक्षीय निर्धार सभा झाली. त्यावेळी अध्यक्ष म्हणून आडळकर बोलत होते. या प्रसंगी कॉम्रेड रामकृष्ण शेरे यांनी देशाच्या सदस्थितीवर प्रकाश टाकला. शेख महेमुदसर यांनी स्वातंत्रपूर्व काळ ते आजची परिस्थिती याचा आढावा मांडला. परभणी जिल्हा परिषदचे माजी अर्थ व नियोजन सभापती अशोक नाना काकडे यांनी राष्ट्रीय एकता-एकात्मता जोपासणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. ॲड.विष्णू ढोले, नगरसेवक रहिमखाँ पठाण, कॉम्रेड अशोक उफाडे, मिलिंद सावंत आदींनी राष्ट्रभक्तीविषयी भावना जागृत केल्या. माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, शेख रहिम, सय्यद मुश्ताक , रघुनाथ बागल, जाहेद घौरी, कॉम्रेड उध्दव पौळ, इसाक पटेल उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन कॉम्रेड रामेश्वर पौळ यांनी केले, तर आभार संयोजक दत्तूसिंग ठाकूर यांनी मानले.