आनंदी जीवनासाठी ‘मीपणा’ सोडा
डॉ.सचिन परब यांचे प्रतिपादन, सेलूतील श्रावणमासी ज्ञानेश्वरी प्रवचनमालिका
परभणी : संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात मनुष्य जन्मभर ‘मी आणि माझेपणा’ या दोन शब्दांभोवती गुरफटलेला राहातो. जोपर्यंत मनुष्याचा मी आणि माझेपणा अंतःकरणातून सुटत नाही. तोपर्यंत परमेश्वर प्राप्ती कदापि शक्य नाही. सार्थक आणि आनंददायी जीवनासाठी प्रत्येकाने ‘मी आणि माझेपणा’ सोडणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राजयोगी ब्रह्माकुमार डॉ.सचिन परब (मुंबई) यांनी केले.
सेलू (जि.परभणी) येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर संस्थान व श्रीज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित अठराव्या श्रावणमासी ज्ञानेश्वरी प्रवचनमालिकेतील २५ वे पुष्प डॉ.परब यांनी सोमवारी (२२ ऑगस्ट) गुंफले. ज्ञानेश्वरीतील पाचव्या अध्यायातील “आणि मी माझें ऐसी आठवण । विसरलें जयाचें अंतःकरण । पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ॥” या विसाव्या ओवीचे परब यांनी निरुपण केले. दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे दाखले देत परब म्हणाले, संपूर्ण अध्यात्म ‘मी आणि माझेपणा’ या दोन शब्दात दडलेले आहे. जन्मभर जे जे करायचं नव्हतं, ते ते केलं. याची कबुली द्यायला उशीर झालेला असतो. परमेश्वराने दिलेल्या गोष्टीवर मनुष्य मी आणि माझेपण दाखवत राहतो. हेच दोन शब्द दुःखाचे कारण आहेत. आणि आनंद, प्रसन्नता, शांती देणारे अध्यात्मही याच शब्दात दडलेले आहे. कोविडने महामारीने या संदर्भाने माणसाला खूप काही शिकविले आहे. कोणतेही कर्म कधीच लपून राहात नाही. मी आणि माझ्या स्वरुपात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी स्वतःशी प्रामाणिक राहा. चिंता, सततच्या तक्रारी बंद करा. माफ करायला शिका. प्रसन्नता, जीवनाचा आनंद निश्चितच मिळविता येईल.
मी म्हणजे चैतन्य स्वरूप शक्ती आत्मा आहे आणि माझा फक्त परमेश्वर आणि मी परमेश्वराचा आहे. ह्याची अंतःकरणातून जाणीव झाली पाहिजे. अशा परिवर्तनासाठी लौकिक शिक्षणासोबतच शाळा कॉलेजमधून राजयोगाचे ईश्वरीय ज्ञान देण्याची नितांत गरज आहे, असे ब्रह्माकुमार डॉ.सचिन परब यांनी सांगितले.