कर्म : कोणतेही असो; सुटणार नाही. भोगावेच लागणार
प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर: सेलूतील श्रावणमासी ज्ञानेश्वरी प्रवचन मालिका, श्रोत्यांची मोठी उपस्थिती
सेलू : कर्म कोणालाही चुकले नाही; चुकणार नाही. या नाही, तर पुढील जन्मात ते भोगावेच लागते. जसे ज्याचे कर्म तसे फळ मिळते. मग ते कर्म चांगले असो, अगर नसो आणि अकर्मावस्थेत मोक्षप्राप्ती आहे, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, असा चिंतन उपदेश नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे चिटणीस प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर यांनी गुरुवारी, २५ ऑगस्ट रोजी केला.
येथील श्री केशवराज बाबासाहेब मंदिर संस्थान व श्रीज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित श्रावणमासी ज्ञानेश्वरी प्रवचन मालिकेचे २८ वे पुष्प नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे चिटणीस प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर यांनी गुरुवारी (२५ ऑगस्ट) गुंफले. या वेळी भगवत गीतेतील तिसऱ्या अध्यायातील कर्मयोग यावर प्राचार्य कोठेकर यांनी चिंतन मांडले. भगवंतांनी अर्जूनाने प्रश्न विचारला, साध्य काही करायचे असेल तर ज्ञान,बुद्धीच्या माध्यमातून पाहिजे ते मिळवता येत असेल, तर युद्ध करायला का सांगता ? अजूनही युद्ध करायचे नाही असाच प्रश्न शिल्लक राहिल्याने भगवंतांनी अर्जुनाला कर्मयोग सांगितला आणि अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर झाला. तो युद्धासाठी तयार झाला. अर्जुनाने भगवंताला कशाकरता प्रश्न विचारले यामागील भूमिका अधिकाधिक ज्ञान मिळावे हीच आहे, असे कोठेकर म्हणाले. कर्म कशाकरता करायचे याचे चार कारणं आहेत. त्यात काही तरी निर्माण करणे, जे निर्माण झाले त्यात बदल करणे, बदल केले तर त्यावर संस्कार करणे, शेवटी फळ देणारे कर्म. कर्म शुद्ध असावे.
कोठेकर म्हणाले, ” तिसऱ्या अध्यायाचा प्रतिपाद्य विषय कर्मयोग आहे. अठरा अध्यायात एक सूत्र आहे ते कर्मयोग आहेच. तुला युद्ध करायचे नाही, तर जिंकायचे, हे श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला सांगितले. अर्जुनाचे निमित्ताने तुम्हा आम्हा सर्वांनाच भगवंतांनी उपदेश केला आहे. प्रत्येकाने संभ्रमात न राहता, समजून कार्यप्रवण झाले पाहिजे, कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”
भगवंतांनी कर्म तीन तीन भागात सांगितले आहे. पहिले, जन्मभर जे जे करता ते क्रीयामान कर्म. हे कर्म तात्काळ निश्चित फळ देणारे कर्म सातत्याने घडणारे आहे. दुसरे, संचित कर्म. हे कर्म फळ देते, पण तात्काळ नाही. फळ देण्यासाठी निश्चित कालावधी घेते. संचित कर्म फळ चांगले असो वाईट भोगावेच लागते. तिसरे, प्रारब्ध कर्म. पूर्ण परिपक्व झालेले असते. हे कर्म भोगूनच संपवावे लागते. या नाही, तर पुढील जन्मात, असे श्री कृष्ण अर्जुन संवादातून सांगितले आहे, असे प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर म्हणाले.