पावसाची दडी : ‘निम्नदुधना’तून पिकांसाठी तात्काळ पाणी सोडा
सेलू तालुका दबावगटाची मागणी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले निवेदन
सेलू (जि.परभणी) : तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके माना टाकत आहेत. अक्षरश: कापूस तूर, सोयाबीन आदी खरीपाची पिके धोक्यात आली आहेत. या पिकांना जीवदान देण्यासाठी लोअर दुधना धरणातून तात्काळ डाव्या व उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी सेलू तालुका दबावगटातर्फे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, सेलू तालुक्यात गेल्या दोन आठवड्यापेक्षा जास्त काळापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे कापूस तूर, सोयाबीन आदी खरीपाची पीके धोक्यात आली आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. नसता शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. लोअर दुधना धरणात मोठ्या, पुरेशा प्रमाणात पाणी साठा उपलब्ध आहे. डाव्या उजव्या कालव्यात तातडीने पाणी सोडल्यास धरणाच्या लाभक्षेत्रातील सुमारे शंभर गावांतील खरीप पिकांना जिवदान मिळणार आहे. या प्रकरणी लक्ष घालून संबंधित विभागास लोअर दुधना धरणाच्या डाव्या उजव्या कालव्यात पाणी सोडण्याचा आदेश दयावा. अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर सेलू तालुका दबावगटाचे निमंत्रक अॅड.श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, दिलीप शेवाळे. अॅड.देवराव दळवे, विलास रोडगे, गुलाब पौळ, रामचंद्र कांबळे, अब्दूल रौफ, लक्ष्मण प्रधान, इसाक पटेल आदींच्या सह्या आहेत.