हैदराबाद मुक्तिसंग्राम : मराठवाड्याने धडा घेण्याची गरज
पत्रकार विजय कुलकर्णी यांचे मत, सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात कार्यक्रम
सेलू जि.परभणी : स्वामी रामानंद तीर्थ यांच्या समर्थ नेतृत्व लाभलेला हैदराबाद मुक्ती संग्राम हा मानवी हक्कांसाठी लढलेला लढा आहे. या लढ्यातून मराठवाड्याने धडा घेणे आवश्यक आहे, असे मत पत्रकार विजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
शहरातील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात शनिवारी (२४ सप्टेंबर ) हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयोजित व्याख्यानात कुलकर्णी बोलत होते.’ हैदराबाद मुक्ती संग्रामात मराठवाड्याचे योगदान ‘ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिक भगीरथजी गेना, महेश भूषण पुरस्कार प्राप्त नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, ललिता गिल्डा या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी नाट्य कलावंत मधुकर उमरीकर होते. ग्रंथालयाचे उपाध्यक्ष एम.आर. पटेल, किरण जयप्रकाश बिहाणी यांची उपस्थिती होती. विजय कुलकर्णी म्हणाले की, ‘ गोविंदराव पानसरे यांच्या हत्येनंतर मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामाने गती घेतली. जर स्वामी रामानंद तीर्थ यांचे समर्थ नेतृत्व मिळाले नसते, तर भारताच्या पोटात आणखी एक पाकिस्तान निर्माण झाला असता. हैदराबाद संस्थान निजामाच्या गुलामीतून मुक्त झाले म्हणून, आपण स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने उपभोग घेत आहोत. हैदराबाद मुक्ती लढा हा समर्पित भावना आपल्या अंगी बाणवणारा लढा होता. प्रास्ताविक ग्रंथालयाचे सचिव प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक अनंत मोगल यांनी केले. , तर सहसचिव चंद्रशेखर मुळावेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास शिंदे, ग्रंथपाल महादेव आगजाळ, पंडितराव जगाडे, अनिल टाके आदींनी पुढाकार घेतला.
हैदराबाद मुक्तिसंग्राम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. एक माणूस म्हणून जगण्याचा मूलमंत्र हा लढा देत आहे. माणूसपण टिकवून ठेवण्यासाठी समर्पण, त्यागाने स्वतःला गाडून घेणार्या हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्य, सचोटीची ही गाथा आहे. सद्यस्थितीतील वातावरण पाहता, प्रत्येकाने मानसिक गुलामगिरीतून मुक्ततता मिळवण्याची जाणीव हा लढा करून देत आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष मधुकर उमरीकर यांनी यावेळी केले.