आंतरभारती : प्रणिता केरे, कीर्ती राऊत, गीता कत्ते, आयेशा खान, युवराज माने विजेते
आंतरभारती राष्ट्रीय निबंध स्पर्धा : परभणी जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल जाहीर, लवकरच पारितोषिक वितरण
परभणी : पूज्य साने गुरुजींनी स्थापन केलेल्या आंतरभारती ट्रस्टतर्फे ” महात्मा गांधींची प्रासंगिकता : वर्तमान समस्या सोडविण्यासाठी महात्मा गांधी मार्गाची उपयुक्तता ” या विषयावर राष्ट्रीयस्तरावर खुली निबंधलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गत परभणी जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल संयोजक बाबासाहेब हेलसकर यांनी शनिवारी, एक ऑक्टोबर रोजी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केला आहे. स्पर्धेत प्रणिता दीपक केरे (मानवत) यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. द्वितीय क्रमांक सेलू येथील कीर्ती अशोकराव राऊत-खजिने व गीता शांतीनाथ कत्ते (परभणी) यांना विभागून, तर तृतीय क्रमांक परभणी येथील पठाण आयेशाखानम् ताहेरखान व युवराज भुजंगराव माने (सेलू) यांना विभागून देण्यात आला आहे. परीक्षणासाठी डॉ.गंगाधर गळगे, डॉ.भाग्यश्री धामणगावकर, संभाजी रोडगे यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेत विविध वयोगटातील एकूण २८ स्पर्धक सहभागी झाले होते. जिल्हास्तरीय विजेत्यांना लवकरच एका कार्यक्रमात रोख पारितोषिक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. विजेत्यांचे निबंध राष्ट्रीय स्पर्धेसाठी पाठविले जाणार आहेत. सहभागी स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्र पाठविण्यात येतील, असे संयोजक बाबासाहेब हेलसकर यांनी कळविले आहे.
परभणी जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रथम : रोख दोन हजार रुपये द्वितीय : दीड हजार रुपये, तृतीय : एक हजार रुपये, राष्ट्रीयस्तरावर प्रथम : रोख दहा हजार रुपये, द्वितीय : सात हजार रुपये, तृतीय : तीन हजार रुपये रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.