महात्मा गांधी जयंती : देवनांद्रा शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य
पालकांतून तीव्र नाराजी, स्वच्छतेकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष
पाथरी : येथील देवनांद्रा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे जाणाऱ्या रस्ता, शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने का होईना, देवनांद्रा ग्रामपंचायतीने स्वच्छ भारत अभियानाला गती द्यावी, परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी केली जात आहे. पाथरी तालुक्यातील देवनांद्रा ग्रामपंचायत स्वच्छतेला केराची टोपली दाखवत असल्याने नागरिकातून नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला, तर अस्वच्छतेने कळस गाठला आहे. यामुळे शाळेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. घाण झालेल्या ठिकाणी डुकरे धुमाकूळ घालत असल्यामुळे त्यांच्याकडून विद्यार्थ्यांवर हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच प्रमाणे डेंग्यूचा धोका बळावत आहे. याकडे ग्रामपंचायत कार्यालय देवनांद्रा लक्ष देईल का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शाळेत अनेक विद्यार्थी शिकायला येतात. परंतु; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे प्रशासनाला काही देणे घेणे उरले नाही असे दिसते. पालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुलांच्या बौद्धिक आणि मानसिक आरोग्याबरोबरच शारीरिक आरोग्याकडेही लक्ष देणे शिक्षण संस्था, विभागही तितकाच जबाबदारी आहे. देशभरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी होत असताना, शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य म्हणजे अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. परिसर स्वच्छ करा; अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.